यंदा तिथीनुसार रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek) राज्याभिषेक सोहळा 2 जूनला साजरा होणार आहे. तसेच 6 जूनला तारखेप्रमाणे राज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जे विधी त्यावेळी करण्यात आलेल्या विधीपैकी मुंज आणि लग्नाचे विधी सोडले तर त्यातील बहुतांश विधी यावर्षी करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात 350 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं जाणून घेऊयात. (Shivrajyabhishek Din 2023)
32 मण सोन्याचं सिंहासन
रायगडावर 6 जून इ.स. 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवलं गेलं होतं. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिने पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था, स्वादिष्ट भोजन अशी तयारी केली जात असे. या सोहळ्यामध्ये ब्राह्मण, श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सगळेच उपस्थित झाले होते. या सोहळ्यासाठी साडेचार हजार राजांना निमंत्रणं देण्यात आली होती.
सप्तधातूंची तुला
राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवाचं दर्शन घेतलं. सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेला अर्पण केली. नंतर 21 मे पासून ते रायगडावर धार्मिक विधीच्या कामात होते. महाराजांनी 28 मे ला प्रायश्चित्त केलं आणि जानवं परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर त्यांनी पुन्हा विवाह विधी केला. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे, लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले.
आठ नद्यांच्या जलाचा अभिषेक
राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चारासह आंघोळ करून मग कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेकाचा सोहळा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केलं होतं. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणं हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला होता. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. ठरलेल्या मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
सोन्याचांदीच्या फुलांची उधळण, वाद्य आणि तोफांचा आवाज
राजसिंहासनाचं दालन 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. शिवाजी महाराज 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रोच्चारण केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुलं उधळली गेली. विविध ताल वाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेला. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला.