
फोटो सौजन्य - Social Media
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पावनक्षेत्र मासाळवाडी येथे भव्य आणि भक्तिमय वातावरणात महावैष्णव मेळावा उत्साहात पार पडला. सच्चिदानंद संत श्रीपादबाबांच्या कृपाशिर्वादाने आणि गुरुवर्य ह.भ.प. श्री पुरुषोत्तम रायजाधव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. आटपाडी पंचक्रोशीतील साधक-भक्त आणि भाविकांच्या सहकार्याने पार पडलेला हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्तिभावाने साजरा झाला.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक उपक्रमांसोबतच समाजजागृतीचा ठोस संदेश देण्यावर भर देण्यात आला. मंदिर परिसरात आषाढी एकादशी २०२५ रोजी उद्घाटन झालेली देशी खिल्लार गोमाता संवर्धनासाठीची गोशाळा हे या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. गोसेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधत या ठिकाणी एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळत होती.
मेळाव्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच बेळगाव परिसरातून दिंड्या आणि साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजनाने झाली. त्यानंतर शिस्तबद्ध दिंडी सोहळा पार पडला. धर्मध्वजारोहण करून गुरुवर्य रायजाधव बाबांच्या शुभहस्ते धर्ममंडपाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठ पूजन आणि वंदे मातरम्च्या गायनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
ब्रह्ममुहूर्तावर विश्वात्मकेंश्वर महादेवाच्या अभिषेकावेळी डमरू, शंखनाद, घंटानाद आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. “ॐ नमः शिवाय”च्या जपात आणि भजन-चिंतनात प्रत्येक भक्त तल्लीन झाला होता. या क्षणी उपस्थित भाविकांच्या अंतःकरणात शिवभक्तीचा ओलावा स्पष्ट जाणवत होता.
मेळाव्यात पहाटेपासून परिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ यांसारख्या सेवा सातत्याने सुरू होत्या. यामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन, शंका-समाधान, अनुग्रह-प्रबोधन या गोष्टींसोबतच वृक्षसंवर्धन आणि गोमाता संवर्धन याबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. “गोसेवा हीच ईश्वर सेवा” आणि “ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.
देशी गोमाता आणि देशी वृक्षसंपदा ही भारतीय संस्कृतीची मुळे असून, त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. सध्या राजकीय आणि सामाजिक अनास्थेमुळे या दोन्हींची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे केवळ धार्मिक कार्यक्रम न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून दिसून आला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या भावनेतून पांडवकडा (मुंबई), सिद्धोबा डोंगर (कोल्हापूर), बोपदेव घाट (पुणे), जरंडेश्वर (सातारा), पंढरपूर परिसर तसेच मासाळवाडी व इतर भागात एक लाखांहून अधिक देशी वृक्षांची लागवड व संगोपनाचे कार्य सुरू आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.
मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी उद्योजक आणि जिल्हा परिषद सदस्य विनायकराव मासाळ यांनी उपस्थिती लावली. त्यांचा सत्कार गुरुवर्य रायजाधव बाबा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विश्वात्मकेंश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तसेच गोशाळा महाराष्ट्रात आदर्श ठरेल, यासाठी आवश्यक ती मदत देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात अनेक गोप्रेमी आणि भाविकांनी गोदान जाहीर केले. काहींनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त, तर काहींनी पितरांच्या स्मरणार्थ गोदान करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. प्रत्येक घरात देशी गोवंश जपावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीच्या दिवशी ‘काला’ करून मेळाव्याची सांगता झाली. परतीच्या वेळी साधक-भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि पुन्हा भेटण्याची आस स्पष्ट दिसत होती. भक्ती, सेवा आणि समाजजागृती यांचा संगम घडवणारा हा महावैष्णव मेळावा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.