फोटो सौजन्य - Social Media
वाशिम येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना सामाजिक व समकालीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा विशेष उल्लेख करत स्वच्छता, प्रबोधन आणि समाजजागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ‘अंधश्रद्धा निर्मूलनात गाडगेबाबांचे योगदान’ या विषयावर बोलताना प्रा. डी. एस. कव्हर यांनी तरुणांनी गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे पालन करून समाजपरिवर्तनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. गाडगेबाबांनी आपल्या कार्यातून स्वच्छता, साधेपणा आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा यांना विशेष महत्त्व दिले होते. त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. महेश देवळे व प्रा. डी. एन. मगर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवावा, असे सांगितले. सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शनकार्यक्रमाचे आयोजन सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात महिला सक्षमीकरण, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, मासिक पाळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे संचालन चैतन्य इंगोले व स्नेहा खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन टेकाळे, तेजस हिवराळे आणि नितेश हनवते यांनी केले.
महिला सक्षमीकरण विषयावर बोलताना स्वप्निल चव्हाण यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड. राधा नरवलिया यांनी मुलींच्या घटत्या जन्मदराकडे लक्ष वेधत स्त्री भ्रूणहत्येसारख्या गंभीर समस्यांवर समाजाने सजग होण्याचे आवाहन केले.
मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक मूल्यांचीही जाणीव झाली असून, समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.






