फोटो सौजन्य - Social Media
राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळाने कडक नियमावली लागू केली आहे. याअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि त्याचे रेकॉर्डिंग जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात विभागीय मंडळाने क्षेत्रीय अधिकारी, केंद्रसंचालक, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
निर्देशानुसार, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होमंडळाकडून क्षेत्रीय अधिकारी व परीक्षा केंद्र संचालकांना निर्देशण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे आवश्यक आहे. तसेच सर्व कॅमेरे सातत्यपूर्ण (continuous) रेकॉर्डिंग मोडवरच ठेवावेत आणि मोशन रेकॉर्डिंग टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रातील सर्व वर्गखोल्या, परिसर तसेच संगणक प्रयोगशाळांमध्ये कॅमेरे कार्यरत असणे अनिवार्य आहे.
रेकॉर्ड केलेले फुटेज पेन ड्राइव्ह, संगणक, हार्ड डिस्क किंवा क्लाउड स्टोरेजवर सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यासही रेकॉर्डिंग सुरू राहावे यासाठी सीसीटीव्ही प्रणाली यूपीएस किंवा इन्व्हर्टरशी जोडणे बंधनकारक आहे. यासाठी किमान दोन तासांचा बॅकअप उपलब्ध असावा, असेही सांगण्यात आले आहे. तांत्रिक कामांसाठी आयटी शिक्षकांची मदत घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
या नियमांचे पालन न झाल्यास संबंधित प्राचार्य, केंद्रसंचालक किंवा कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असून, ‘महाराष्ट्र गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२’ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. परीक्षा केंद्रांवर भेट देणारी भरारी आणि बैठे पथके सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असल्याची खात्री करून अहवाल सादर करणार आहेत. याशिवाय, जिल्हा दक्षता समिती किंवा मंडळाने मागणी केल्यास सीसीटीव्हीचे लाईव्ह एक्सेस देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. कॅमेरे बंद ठेवणे, फुटेज न देणे किंवा एक्सेस नाकारणे हे गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न मानला जाईल. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ‘सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याखाली’ ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.






