
Raju Shetty Satara Varne MIDC Protest,
Raju Shetty Satara Politics: वर्णे–निगडी परिसरातील सुपीक शेती वाचविण्यासाठी सुरू असलेल्या एमआयडीसीविरोधी जनआंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. आगामी ऐतिहासिक लॉंगमार्चपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी साहेब स्वतः या लढ्याच्या मैदानात उतरणार असून, पुढील आठवड्यात वर्णे येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट एल्गार सभा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. याचबरोबर राज्यातील विविध पक्ष, शेतकरी संघटना व सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांनाही या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू असून, त्यांच्या तारखा निश्चित करून वर्णे येथे भव्य सभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी धनगरवाडी येथे झालेल्या विराट सभेत केली. ही घोषणा होताच घोषणांच्या गजरात संपूर्ण सभास्थळ दणाणून गेले.
धनगरवाडी येथे झालेली ही एल्गार सभा केवळ एक सभा नव्हती, तर वर्णे–निगडी एमआयडीसीविरोधातील लढ्याचे रणशिंग ठरली. पंचक्रोशीतील शेतकरी, महिला, युवक, आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी अभूतपूर्व उपस्थिती लावत हा संघर्ष आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
सभेला संबोधित करताना राजू शेळके म्हणाले, “दिवसागणिक वाढणारा जनतेचा प्रतिसाद ही आपल्या विजयाची नांदी आहे. आज देवाच्या मंदिरात उभा राहून देवाला साक्ष ठेवून मी शपथ घेतो की, शेतकरी आणि सैनिक बांधवांची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा लढा केवळ जमिनीचा नाही, तर आपल्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचा आहे. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी हा संघर्ष अखेरपर्यंत सुरू राहील.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सचिव प्रवीण धसके यांनी महिलांची लक्षणीय उपस्थिती हे आंदोलनाचे सर्वात मोठे बळ असल्याचे सांगत, “आज माताभगिनी ज्या ताकदीने या लढ्यात सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे आम्हाला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे,” असे सांगितले. त्यांनी या आंदोलनाला सुरुवातीपासून व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमांचे टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर अभिनंदन केले.
सभेत ३ मे २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या एमआयडीसी अधिसूचनेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तेरा वर्षे हरकती मागविण्याची प्रक्रिया न राबविणारे प्रशासन अचानक जागे कसे झाले? असा सवाल उपस्थित करण्यात आला. काही स्वार्थी घटकांच्या दबावाखाली स्थानिक महसूल व एमआयडीसी प्रशासन शासनाला दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
यापुढे एमआयडीसीविरोधी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सामाजिक परिणाम मूल्यांकन संदर्भात स्वतंत्र सर्वेक्षण करून शासनापुढे वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय सभेत जाहीर करण्यात आला. शासनाने सिंचनासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च, सुपीक शेती, ऊस, फळबागा, भाजीपाला उत्पादन, पर्यावरणावर होणारा परिणाम, भूजल, जैवविविधता, ग्रामस्थांचे पुनर्वसन आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर होणारे दुष्परिणाम यांचा सविस्तर अहवाल शासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तेरा वर्षांनंतर सुपीक शेती बळकावण्याचा डाव आखणाऱ्यांचा बुरखा फाडल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
सभेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. त्यांनी अत्यंत तळमळीने आपली मते मांडत शेतकऱ्यांच्या न्याय्य लढ्याला ठाम पाठिंबा जाहीर केला. युवकांचा उत्स्फूर्त आणि आक्रमक सहभाग संपूर्ण सभेचे प्रमुख आकर्षण ठरला. विशेषतः युवा निवेदक सुजित काळंगे यांनी प्रभावी सूत्रसंचालनातून युवकांमध्ये संघर्षाची जिद्द आणि जनजागृती निर्माण केली.
या सभेस सुधाकर शितोळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, वर्णे–निगडी पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगरवाडीच्या एल्गार सभेने आता या आंदोलनाला नवे बळ दिले आहे. पुढील आठवड्यात वर्णे येथे होणाऱ्या विराट सभेत राजू शेट्टी कोणती भूमिका मांडणार, राज्यातील आणखी कोणते वरिष्ठ नेते या लढ्यात सहभागी होणार, लॉंगमार्चची अंतिम दिशा काय असणार आणि सुपीक शेती वाचविण्याच्या या निर्णायक संघर्षात पुढचा टप्पा कोणता असणार, याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.