इंदापुरातून कोणाला उमेदवारी देणार? शरद पवारांनी केलं सूचक विधान
बारामती/अमोल तोरणे : राज्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विविध भागात आपणास मोठा प्रतिसाद मिळत आहे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इंदापूरसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल, मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाची प्रक्रिया संपल्यानंतर याबाबतचा योग्य निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी बोलताना केले. उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी पुष्टीही पवार यांनी यावेळी जोडली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांची गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली. इंदापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत शरद पवार बोलत होते. आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, दशरथ माने, अमोल भिसे, तेजसिंह पाटील, सागर मिसाळ, महारुद्र पाटील, अशोक घोगरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आशादायक चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने जागांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संजय राऊत, नाना पटोले व जयंत पाटील यांना दिलेले आहेत, हे जागावाटप झाल्यानंतर आपल्या पक्षातील उमेदवारी बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान लोकसभेला चारशे जागा येतील असे सांगत होते, मात्र त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. आज महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. यंदा आम्ही दहा जागा लोकसभेच्या लढविल्या, त्यातील आठ जागांवर विजय मिळाला, यंदा लोकांनीच बदल करायचा निर्णय घेतला होता. नेत्यांनी काही सांगितले तरी लोकांनी त्यांना जे योग्य वाटले तो निर्णय घेतला. बारामतीतही अनेक नेत्यांनी भाषणे केली, पण तुम्हीच ठरवलेले होते, दीड लाखांहून अधिक मताधिक्याने आपला उमेदवार विजयी झाला.
काही लोकांना आभाळाकडे बघून पाऊस पडेल की नाही ते समजते, आता अनेकांना वाटू लागले आहे की पाऊस पडेल त्यामुळे आपल्याकडील गर्दी वाढू लागली आहे. राज्यात कुठही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक जमतात, लोकांनीच या निवडणूकीत जिंकायच ठरवले आहे, त्यामुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही.
महाविकास आघाडी तीन पक्षांची आहे, प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण होईल, इच्छुकांना नाही तर कार्यकर्त्यांना विचारुन मगच निर्णय घेतला जाईल, आगामी दहा दिवसात हे काम पूर्ण होईल. माझा अंदाज आहे की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान आयोग तारखा जाहीर करतील. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात आम्ही उमेदवार निश्चित करु. इंदापूरच्या बाबतीतही सर्वांशी विचारविनिमय करुन मगच निर्णय घेतला जाईल. यंदा इंदापूरमध्ये बदल घडेल अस वातावरण आहे, त्या मुळे निवडून येण्याची क्षमता विचारात घेत सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.
आघाडी म्हणून लढणार असल्याने काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत, निवडणूकीत त्यांचेही काम करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचा अधिकार आहे, पण इंदापूरचा पुढचा आमदार आपलाच असेल हे लक्षात घेत सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन शरद पवार यांनी इंदापूरच्या कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान यावेळी आप्पासाहेब जगदाळे, तेजसिंह पाटील, दशरथ माने, अशोक घोगरे यांनी आपल्या भाषणात इंदापूर मधील जनतेने शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर तोच आमदार निवडून दिला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ज्याने पक्षासाठी काम केले आहे, तोच उमेदवार इंदापूर मध्ये द्यावा, अशी मागणी यावेळी केली. आपण द्याल तो उमेदवार आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, मात्र उमेदवार हा पक्षातीलच असावा, असा आग्रह यावेळी केला.
नको माजी, नको आजी, आम्हाला हवा नवीन बाजी…
इंदापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांच्याकडे निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. नको माजी नको आजी आम्हाला हवा नवीन बाजी या शब्दात सोनाई उद्योगाचे प्रमुख दशरथ माने यांनी शरद पवार यांच्यापुढे आपल्या भावना मांडल्या. इंदापूर तालुक्यात आम्हाला दोन सासू असून लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही सासवांनी आम्हाला मोठा त्रास दिला असून बूथ एजंट पळवण्याचे काम या दोन्ही सासवांनी केल्याची टीका माने यांनी हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली.