अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजळणार; आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश
मुसळधार पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरात नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरतं. याचं कारण म्हणजे शहरातून वाहणारी सीना नदी आणि भिंगार नाल्याच्या आसपास झालेलं अतिक्रमण. यासगळ्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. सीना नदीच्या पूररेषेची फेर आखणी आणि नदीचं रुंदीकरण आणि खोली वाढवण्याची मागणी मागणी जगताप यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. जगताप यांनी नदीच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या निधीकरिता सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर राज्य शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे.
हेही वाचा- प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले येणार एकत्र ? अध्यक्ष पदाची दिली थेट ऑफर
नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. यामुळे नदीला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी विशेष बाब आहे. कारण नगर जिल्ह्यात क्विचितच वरुण राजाची कृपा होते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो. पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची तारांबळ उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली.
आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत समस्या मांडली. सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते.नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजळणार आहे.
शहरातून वाहणारी सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार
सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.