
फोटो सौजन्य - Social Media
मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग ‘हुतात्मा एक्सप्रेस’चा रौप्यमहोत्सव अभिमानाने साजरा करत आहे; १५ जुलै २०२६ रोजी या गाडीच्या समर्पित सेवेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. १५ जुलै २००१ रोजी सुरू झाल्यापासून, ही गाडी विश्वसनीय संपर्क, प्रवाशांची सोय आणि प्रादेशिक प्रगतीचे प्रतीक बनली असून, तिने सोलापूर आणि पुणे येथील लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान जलद, आरामदायक आणि विश्वसनीय अशी दिवसा धावणारी रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्सप्रेस गेल्या पाव शतकात केवळ एक ‘गाडी’ न राहता त्याहून अधिक काहीतरी बनली आहे. लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार वर्ग आणि पर्यटकांची ती एक विश्वासू सोबती ठरली आहे, तसेच या दोन शहरांमधील आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गाडी क्रमांक १२१५८ (सोलापूर-पुणे) आणि गाडी क्रमांक १२१५७ (पुणे-सोलापूर) म्हणून धावणारी हुतात्मा एक्सप्रेस सुमारे चार तासांत २६३ किलोमीटरचे अंतर कापते. ही गाडी कुर्डुवाडी आणि दौंड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबते, ज्यामुळे संपूर्ण भागात अखंड संपर्क व्यवस्था उपलब्ध होते. सध्या ही गाडी १६ डब्यांसह (कोचेस) धावते; यात १ एसी चेअर कार, १ एसी ३-टायर इकॉनॉमी कोच, २ स्लीपर क्लास कोच आणि १० सेकंड क्लास सीटिंग कोच यांचा समावेश आहे. आराम आणि परवडणारे दर यांचा समतोल साधत समाजातील विविध घटकांतील प्रवाशांची ही गाडी सेवा करते.
हुतात्मा एक्सप्रेसला हे नाव सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील चार अमर हुतात्म्यांच्या—जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा आणि मल्लप्पा धनशेट्टी यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे सर्वोच्च बलिदान आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. सोलापूरच्या या शूर सुपुत्रांना दिलेली ही एक ‘श्रद्धांजली’च आहे, जी त्यांची देशभक्ती आणि देशाप्रती असलेली अटळ निष्ठा यांची आठवण जिवंत ठेवते.
गेल्या २५ वर्षांत, हुतात्मा एक्सप्रेस ही सोलापूर-पुणे मार्गावरील सर्वात विश्वसनीय आणि पसंतीच्या रेल्वे सेवांपैकी एक बनली आहे. यामुळे दैनंदिन प्रवासास सुलभता आली आहे, व्यापार व वाणिज्य क्षेत्राला चालना मिळाली आहे, शैक्षणिक उपक्रमांना आधार मिळाला आहे, आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारली आहे आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले आहे; अशा प्रकारे या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या गाडीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
बसस्थानक परिसरात अवैध वाहतुकीवर दणका! २०० मीटर परिसरात नियमभंग करणाऱ्या वाहनांची थेट जप्ती
‘हुतात्मा एक्सप्रेस’ आपल्या सेवेच्या २६ व्या वर्षात पदार्पण करत असताना, हा रौप्यमहोत्सव केवळ तिच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा टप्पाच नाही, तर रेल्वे आणि ती ज्या समाजाची सेवा करते, त्यांच्यातील दृढ बंधाचा उत्सवही आहे. मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग प्रवाशांचा आराम, सुरक्षा आणि सेवेचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. ही प्रतिष्ठित गाडी लोक, ठिकाणे आणि आकांक्षा यांना जोडण्याचा आपला अभिमानास्पद वारसा आगामी अनेक वर्षे असाच जपून ठेवेल, याची खात्री विभाग देत आहे.