पुणे : राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांची चर्चा करुन निवड करण्यात आली आहे. लोकसभेमध्ये संधी दिल्यानंतर लगेचेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. राष्ट्रावादी पक्षामध्ये छगन भुजबळ यांच्यासह काही इच्छुक नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “18 तारीख शेवटची आहे, तो पर्यंत वाट बघावी लागेल. पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्याचेचं मी मनापासून आभार मानते. एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने दाखवलाय. त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न करेन,” असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
पक्षातील नाराजी नाट्य
त्यानंतर माध्यमांनी सुनेत्रा पवार यांना पक्षातील छगन भुजबळ व पार्थ पवार यांच्या नाराजीबद्दल प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अशी नाराजी कुठे दिसली नाही, भुजबळ फॉर्म भरतातना उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या. नक्कीच कोणती नाराजी नाही” तसेच पार्थ पवारांच्या नाराजीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, पार्थने स्वत:च सांगितलं की, सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी राज्यसभेच अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. त्याचा सुद्धा आग्रह होता. सगळ्या पक्षाच्या सहमतीने उमेदवारी जाहीर झाली आहे” असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
अजित पवार तयार होते का?
सुरुवातीला अजित पवार तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार नव्हते का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर उत्तर देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “खरंतर मला उमेदवारी द्यावी ही पक्षातून आणि जनतेतून मागणी होत होती. आग्रह धरु नये म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती केली. लोकसभेच्या उमेदवारीवेळी सुद्धा जनतेतून मागणी करण्यात आली होती” असे मत राज्यसभेच्या उमेदवारी सुनेत्रा पवार यांनी मांडले.