
Shivjayanti 2026 : शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 'ते' तब्बल 30 वर्षांपासून करत आहेत अनवाणी पायपीट
अक्कलकोट / नंदकुमार जगदाळे : ‘साथी हात बढाना एक, अकेला थक जाएगा मिलकर बोज उठाना’ या गाण्याची आठवण ध्येयवेड्या नगरसेवक तम्मा शेळके यांच्याकडे पाहिल्यावर होते. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे आई भवानी मातेचा गजर करताच जय शिवरायची घोषणा ओठावर येतेच. छत्रपती शिवरायांच्या स्मृती जागताच महाराष्ट्र नव्हे तर राष्ट्र नव्हे तर सारेजग पेटून उठतो.
राष्ट्राभिमान जागृत होतो, अशा थोर युगपुरुष राजे छत्रपती शिवाजी राजांचा प्रेरणादायी अश्वारुढ पुतळा ऐतिहासिक राजघराण्याचा इतिहास वारसा लाभलेल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री व्हावा ही महत्वाकांक्षा उराशी बाळगून नगरसेवक तम्मा शेळके यांनी एक पण केला जोपर्यंत अश्वारुढ पुतळा उभा ठाकत नाही. तोपर्यत अनवाणी फिरणार असा केला. आज ३० वर्षे झाली ते अनवाणी फिरतात.
शिवजयंती उत्सव जवळ आला की, अक्कलकोटमध्ये विविध मंडळाकडून उत्साहाने शिवजयंती साजरी होती. शिवप्रेमी मंडळाकडून शासनकर्त्याकडून, नगरपालिकेकडून शिवरायांचा पुतळा उभा राहण्याबाबत ठोस कृतीची अपेक्षा शिवभक्तांकडून जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ध्येयवेडे तम्मा शेळके यांनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा विडा उचलला आहे, हे काम पूर्ण केल्याशिवाय पायात पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे. याकरिता तम्मा शेळके गेली ३० वर्षांपासून अद्यापही अनवाणी फिरतात. या कामाकरिता मी जेव्हा फिरतो तेव्हा पायाला चटके बसल्याने घेतलेल्या या ‘वसा’ची आठवण होते. येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते, असे शेळके यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता विविध परवानगी ना हरकत पत्र शासनाच्या अटीस अधिन राहून आवश्यक ती तयारी अडचणी दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके या कामाकरिता ३० वर्षापासून एकाकी प्रयत्न करत आहेत. याकरिता विविध सामाजिक मंडळे, नेते मंडळी, लोकसहभाग वाढण्याची गरज आहे. एकत्रित सामुदायिक प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे.