गोसेच्या कालव्यात तरुणाचा मृत्यू
कराड : करवडी (ता.कराड) येथे विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडीत शोककळा पसरली आहे. राजवर्धन किशोर पाटील (वय 22) आणि राजेंद्र दादा कोळेकर-मोरे (वय 55) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्रि साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेतजमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर यांना पोहण्याची इच्छा झाली. याबाबत राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली. यावेळी ‘दुपारची वेळ आहे, विहिरीत उतरू नका’, असे वडिलांनी सांगितले. फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले.
दरम्यान, 15-20 मिनिटांनी किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र, अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. विहिरीच्या शेजारी दोघांची कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाईट गेल्यामुळे आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही. शेवटी कराडमधील मासेमारी करणाऱ्या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर यांचे मृतदेह बाहेर काढले.
कराड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल
याबाबतची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. शवविछेदन झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.