
चिपळूणातील उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचा प्रकल्प आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय या उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, आगामी दोन महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी हा पूल खुला व्हावा, यासाठी संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासन प्रयत्न करत आहेत.या पुलाच्या निमित्ताने मुंबई गोवा महामार्गावरील एक महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे.
चिपळूण शहरांतर्गत येणाऱ्या महामार्गावर बहादूरशेख ते प्रांत कार्यालय या सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक व रहिवाशी संकुल असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, या मागणीची दखल घेऊन या मार्गावर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला व रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला पुलाचे काम देण्यात आले होते. काम सुरू होऊन दोन ते तीन गर्डर चढवण्यात आले. मात्र, काम सुरू असतानाच गर्डर कोसळले. शासनाने तत्काळ दखल घेऊन पुलाचा संपूर्ण आराखडा रद्द करून नवीन पुलाचा आराखडा तयार करण्यात आला व कामाला नव्याने सुरुवात करण्यात आली.
महामार्गावरील महत्वाचा प्रकल्प
तब्बल ९५ पिलर असलेला १८०० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदी असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचा हा पूल ठरणार आहे. बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाला जोडूनच हा उड्डाणपूल होत असून चिपळूण प्रांत कार्यालयाच्या पुढे मुख्य महामार्गाला हा उड्डाणपूल जोडला गेला आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने दिवसरात्र हे काम सुरू ठेवल्याने जलद वेगाने हे काम पूर्णत्वाकडे जात असून, आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गणेशोत्सवात प्रवास होणार सुकर
पुलाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.उर्वरित १० टक्के काम येत्या २ महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रांत कार्यालयाकडील काही गर्डर आणि मुख्य रस्त्याला जोडरणारा जोड रस्ता इतकेच काम आता शिल्लक राहिले असून गणेशोत्सवापूर्वी हे काम मार्गी लागण्याची श्यक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास या उड्डाणपुलावरून होणार आहे.
वाई-पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प