हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर स्पृहा जोशीने शेअर केली कविता; म्हणाली, "जीआर रद्द झाला पण…"
सध्या राज्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोठा वादंग निर्माण झालेला आहे. राजकीय नेते, विरोधी पक्ष नेते, साहित्यिक आणि सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करताना दिसत आहेत. रविवारी २९ जूनला पार पडलेल्या बैठकीत सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आता सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने (Spruha Joshi) इन्स्टाग्रामवर एक कविता शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या कवितेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
करण जोहरने उघड केले बॉलीवूड व्हॉट्सॲप ग्रुपचे गुपित, म्हणाला- ‘जर चॅट्स लीक झाले तर …’
स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच कवयित्रीसुद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री विविध सामाजिक विषयांवर कविता शेअर करत असते. काही तासांपूर्वीच स्पृहाने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करताच कविता सादर केली आहे. या कवितेचा व्हिडिओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. स्पृहाने व्हिडिओ शेअर केलेल्या कवितेचे शीर्षक ‘मायबोली’ असं आहे. “जीआर रद्द झाला खरा.. पण!!!” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने कविता शेअर केलेली आहे.
ज्ञानोबांची अमृतबोली
ज्ञानाची रसगंगा
मायबोलिच्या उरे अंगणी
आता केवळ दंगा
परंपरेतुन अभंग झाली
अमुची मायमराठी
अभिजात तिचे सौंदर्य देखणे,
कायम अमुच्या पाठी..
परंतु चाले खेळ अनोखा
महाराष्ट्र देशा
अपुल्या डोळ्यासमोर हरवे
आपुलीच हो भाषा.
सत्ताधारी कुणी विरोधी
मोठी राजघराणी
हताश होऊन बघे मराठी
उदास केविलवाणी !
मंत्रालय वा हो न्यायालय
दबकत पाउल टाकी..
अधिक- उणे च्या गणितामध्ये
उरली केवळ ‘बाकी!’
श्रेय लाटुनी मराठिचे
वर उद्धाराच्या बाता
मुळी न वाटे लाज तयांना
नक्राश्रू ढाळता..
राजनीतिच्या पटावरूनी
हलती प्यादी सारी,
उगा उमाळे, कढ हे खोटे
बोलायाची चोरी!
दुस्वासा कुठल्या भाषेच्या
मुळी नसावा थारा
सक्तीने पण होऊन जातो
जीव उगाच बिचारा !
कोणासाठी कोणा कारण
हा कट रचला जातो..
एकशे पाच हुतात्म्यांचा
श्वास पुन्हा गुदमरतो..
मायबोलिच्या पुनरुथ्थाना
असेच काही व्हावे
ज्ञानोबांनी सदेह आता
मराठदेशी यावे!!
स्पृहा जोशीने शेअर केलेल्या कवितेवर चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून प्रतिक्रिया येत आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी स्पृहाचं कौतुक केलेलं आहे. “ताई तू अगदी मनातलं मांडलं…”, “खूप मस्त स्पृहा”, “खूप छान ओळी स्पृहा… मनाला भिडणाऱ्या… आणि त्याही उत्तम सादरीकरण सहित… क्या बात…!”, “खूप सुंदर, सत्य आहे, आणि खरच ज्ञानोबांनी खरंच यावे स्पृहा तुझे कविता नेहमीच खूप छान असते आणि तू म्हणतेस हे खूप सुंदर, मला खूप दुःख होतं की मला असं छान मराठी का नाही येत” शरद पोंक्षे यांनी स्पृहाच्या कवितावर प्रेमाचा वर्षाव केला असून “सुंदर कविता लिहीली आहेस तू…” अशीही प्रतिक्रिया दिली आहे. तर, अविनाश नारकर यांनी स्पृहाच्या कवितेवर “व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा स्पृहे…. खूप खूपच छान व्यक्त झालीयेस बाळा…!!” अशी प्रतिक्रिया दिलीये.