
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी संगीतविश्वातील एक ओळखीचा आवाज म्हणजे गायक विनय मांडके यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. दादरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनय मांडके हे नाव अनेकांना माहीत नसले तरी त्यांचा आवाज मात्र खूप ओळखीचा होता. त्यांनी हजारो जाहिरातींना आवाज दिला होता. ‘हमारा बजाज’ ही प्रसिद्ध जिंगल त्यांच्या आवाजामुळेच खूप गाजली.
त्यांनी सुमारे 7 हजारांहून अधिक जिंगल्स आणि काही चित्रपटांसाठीही गाणी गायली होती. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांमध्येही त्यांचा आवाज ऐकायला मिळायचा, त्यामुळे त्यांना “लक्ष्याचा आवाज” असेही म्हटले जायचे.
त्यांच्या साध्या आणि ऊर्जावान आवाजामुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे लक्षात राहिले.विनय मांडके यांनी फक्त स्टुडिओपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर त्यांनी लाइव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांना संगीताचा आनंद दिला. स्टेजवरील त्यांची उपस्थिती आणि गायकी प्रेक्षकांना खिळवून ठेवायची.
विनय मांडके यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी जाहिरात आणि चित्रपट क्षेत्रात सातत्याने काम करत आपली ओळख मजबूत केली. त्यांनी जवळपास चार हजाराहून अधिक जिंगल्स गायले, ज्यात ‘ये जमीं ये आसमां…’, ‘कलभी आजभी, आजभी कलभी’ आणि ‘जो ओके साबुनसे नहाये, कमलसा खिल जाये’ यांसारखी प्रसिद्ध जाहिरातींची गाणी होते.
त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विनय मांडके यांचा आवाज आता ऐकू येणार नसला, तरी त्यांच्या गाण्यांमधून आणि जिंगल्समधून ते कायम लोकांच्या आठवणीत जिवंत राहतील.