जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या राजीनाम्यामागे बिहार कनेक्शन? 'या' बाबी ठरताहेत चर्चेचं कारण...
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये वैद्यकीय कारण दिले आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतिपदावर कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच महाराष्ट्रातून एक मोठं नावही समोर आले आहे.
जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामध्ये त्यांनी सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल राष्ट्रपतींचे आभार देखील मानले आहेत. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा उपराष्ट्रपती कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे. संभाव्य नावामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं
हरिभाऊ बागडे यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याआधी ते 1995 ते 1999 या कालावधीत राज्याचे मंत्री देखील होते. तर 27 जुलै 2024 रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. सध्या ते राज्यपाल पदावर आहेत. दरम्यान, जर बागडे यांची या पदासाठी निवड झाली तर ते उपराष्ट्रपतिपदावर पोहचणारे पहिले महाराष्ट्रीय असणार आहे.
अधिवेशनातच होऊ शकते घोषणा
नव्या उपराष्ट्रपतीची निवडणूक संसदेच्या सुरु झालेल्या अधिवेशनातच होऊ शकते. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात. बागडे यांनी सध्या राजस्थानात आपला चांगला जम बसवला आहे. मेवाड दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील माती आपल्या कपाळाला लावून राजस्थानमधील जनतेची मने जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आमित शाह या दोघांशीही त्यांचे चांगले संबंध आहे. आता याचा फायदा त्यांना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडीने होतो का हे पाहणे गरजेचे बनले आहे.