भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?
नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी. या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वत:ला अभिमानाने ‘सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक’ असलेल्या भारताचे नागरिक म्हणवून घेतो. हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून, लाडू आणि जलेब्यांचे वाटप करून साजरा करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली. काय असेल यामागचे कारण?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित
उद्या (15 ऑगस्ट) भारतचा 78 वां स्वातंत्र्यदिन. पण हाच दिवस का निवडला गेला? खरंतर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता.
लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉटमन्समध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते. या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले.
15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला?
ब्रिटीश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. त्यांच्या जीवनातील १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता. कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांना शरणागती पत्कारली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सैन्यात मित्र राष्ट्रांचे कमांडर होते. जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले. या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला.
यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन
1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यंदा भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम “विकसित भारत” जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते.