Raigad : रायगड जिल्ह्यामधील एका १२ वर्षाच्या लेकाने नवा पराक्रम केला आहे, सध्या त्याची राज्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. जलतरण पटू यांच्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू अशी स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे १७ किमी अंतर अवघ्या २ तासात पार केले आहे. या स्पर्धेमध्ये तनयने सर्वात वेगवान जलतरण पटू होण्याचा मान मिळवला आहे. तनय लाड हा कामोठे-पनवेलचा रहिवासी आहे.
स्पर्धेमधील तनयच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, तनयने २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.४६ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात उडी घेतली आणि भरतीचे लहरी प्रवाह, वाऱ्याचा जोर आणि हवामानाच्या स्थितींशी झुंज देत हा लाटांवरचा खडतर प्रवास त्याने ११.१४ ला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू येथे संपवुन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. सध्या राज्यामध्ये त्याच्यावर कौस्तुकाचा वर्षाव केला जात आहे.
तनय सध्या न्यू होरायझन पब्लिक स्कूल, पनवेल येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे, तसेच याआधी २०२४ मध्ये त्यानी थायलंडमध्ये ओशियन मॅन स्पर्धेमध्ये कांस्यपदक, संकरॉक ते गेटवे, पेरियार कोची केरळ, विजयदुर्ग, रंकाळा कोल्हापूर येथे रौप्यपदक, आणि मालवण, पोरबंदर स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या जलतरण कौशल्यांचे सुरेख प्रदर्शन केले आहे आणि अनेक पदकाची लूट देखील केली आहे.
स्पर्धा झाल्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, १ तासानंतर खूप जास्त फेस येत होता, जेव्हा त्याने एलिफंटा पार करत होता तेव्हा. तरीही त्याने त्या लाटांवर त्याचा वेग कमी केला नाही असे त्याने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले. त्यानंतर त्याला ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार देखील केला आहे.
तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या कुटुंबीयांबरोबरच प्रशिक्षक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.