
Lionel Messi चा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक; नेमकं कारण काय? मैदानावर कधी परतणार?
नवीन स्वरूपानुसार, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात एकूण १४ संघ सहभागी होतील. परंतु, प्रथम क्रमवारीत १२व्या, १३व्या आणि १४व्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये पात्रता फेरी खेळवली जाईल. त्यातून केवळ एकच संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरेल. यानंतर, मुख्य स्पर्धेत १२ संघांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागले जाईल. दोन्ही मंडळांचा सर्वात मोठा आक्षेप या बदलाच्या वेळेवर आणि प्रक्रियेवर आहे.
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषकाला १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, क्रिकेट स्कॉटलंड आणि केएनसीबी (KNCB) स्पर्धेचे स्वरूप आणि पात्रता मार्गात केलेल्या मोठ्या बदलांमुळे नाराज आहेत. एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘पुरुषांच्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी पात्रता मार्ग आणि स्पर्धेच्या स्वरूपात इतके मोठे बदल करण्याच्या आयसीसीच्या निर्णयामुळे क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन अत्यंत निराश आहेत.’ दोन्ही मंडळांच्या मते, हे बदल सहयोगी सदस्य देशांच्या क्रिकेटसाठी एक मोठा धक्का आहेत आणि यामुळे जागतिक स्तरावर क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी गेल्या काही वर्षांत केलेल्या प्रयत्नांना हानी पोहोचू शकते.
क्रिकेट स्कॉटलंड आणि केएनसीबीने म्हटले आहे की, ‘ ज्यावेळी क्रिकेट नवीन देशांपर्यंत आणि नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी विकसनशील राष्ट्रांच्या महत्त्वपूर्ण संधी कमी करणे हा एक चुकीचा संदेश देतो.’
बोर्डाने म्हटले की, ‘आम्ही जागतिक क्रिकेटला मजबूत करण्यासाठी आयसीसी आणि इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत. परंतु, आम्हाला या बदलांचे परिणाम आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेबद्दल गंभीर चिंता आहे.’
बदलांच्या घोषणेनंतर, या दोन्ही देशांनी इतर सहयोगी सदस्य राष्ट्रांसोबत मिळून आयसीसीसोबत दोन बैठका घेतल्या. त्यांनी बदलांसंबंधी अधिकृत लेखी माहिती आणि संपूर्ण प्रक्रियेचे स्पष्टीकरण मागितले. त्यांनी भविष्यातील निर्णयांमध्ये सुधारणा करण्याची आणि पूर्ण सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय नियोजन बैठकांमध्ये सहयोगी सदस्यांचा समावेश करण्याचीही विनंती केली.
परंतु, दोन्ही बोर्डाने संयुक्त निवेदनात म्हटले की, ‘दुसऱ्या बैठकीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटूनही त्यांना आयसीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. हे निराशाजनक असून आम्ही उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांचा हा अनादर आहे.’
क्रिकेट स्कॉटलंड आणि केएनसीबीने अखेरीस आयसीसीला सहयोगी सदस्य राष्ट्रांशी संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक क्रिकेटच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य देऊन, सर्व सदस्य राष्ट्रांशी खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने चर्चा व्हावी, अशी दोन्ही मंडळांची इच्छा आहे. ‘आम्ही आयसीसीला आवाहन करतो की, त्यांनी आपल्या सहयोगी सदस्यांशी पुन्हा संवाद साधावा आणि सर्व सदस्य राष्ट्रांशी खुल्या व पारदर्शक पद्धतीने चर्चा करून जागतिक क्रिकेटच्या दीर्घकालीन हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,’ असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.