काही दिवसांआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तारखा जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. निवडणुकीचे पडसाद देशभरात सगळीकडे उमटू लागले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. राज्यात ५ टप्य्यांमध्ये मतदान केले जाणार आहे. देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदान १९ एप्रिलला होणार आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ भागांमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली वेळ आता संपत आली आहे. तर राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २६ एप्रिलला होणार आहे. २६ एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे निवडणूक लढणाऱ्या मनोज गेडाम यांनी निवडणूक अर्ज भरण्यासाठी १२,५०० रुपयांचे सुट्टे पैसे आणले. त्यांनी हे पैसे नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडे जमा केले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज गेडाम हे यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे १२,५०० रुपयांची नाणी जमा केली आहेत. मात्र त्यांनी जमा केलेले हे पैसे मोजण्यासाठी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे त्यांनी रक्कम स्वतः मोजून निवडणूक आयोगाकडे जमा केली, असे सांगण्यात आले आहे. गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कर्मचाऱ्यांनी हि सर्व नाणी मोजून त्यांनी वेगवेगळ्या लहान पिशव्यांमध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे जमा केली.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानि लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात. “मी गोरगरीब जनतेची अनेक वर्षे सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे,तसेच जनतेनी दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यासाठी घेऊन आलो आहे” असं मनोज गेडाम म्हणाले.