मुंबई : ऐन खरीपाच्या तोंडावर बाजारात ‘महाबीज’ बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा झाला आहे. ‘महाबीज’चे यावर्षी फक्त ४२ हजार क्विंटल बियाणे बाजारात आहे. ‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे महागल्यानंतर आता शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्यांसाठी फरफट होत आहे. दरवर्षी राज्यभरात असते जवळपास १० लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्याची मागणी असते. असे असताना फार कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंनी ‘महाबीज’ने मागच्या वर्षी सोयाबीन बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. आजही त्यांनी यावर भाष्य केले आहे.
बियाणे दरवाढीवर अंकुश लावण्यात प्रत्येकच सरकार अपयशी झाली आहे. भाजपचे असो, शिवसेनेचे असो की आमचे सरकार असो. यात बियाणे कंपन्यांची एकप्रकारे मक्तेदारी झाली आहे. यातला झारीतला शुक्राचार्य कोण? याचा शोध घेतला पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केल्याने एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. अशातच महाबीजने जे सोयाबीनचे भाव वाढवले आहेत त्याची काही गरज नाही, कंपनीपेक्षा शेतकरी पारंपारिक पद्धतीने चांगले बियाणे तयार करतो.
महाबीजने कित्येकदा बाजारातून सोयाबीन खरेदी केले आणि पॅकेटमध्ये भरून विकले याची उदाहरणे आहेत. याच फसवेगिरीला आळा बसावा यासाठी उपाय म्हणून मी बियाणे महोत्सव अमरावती आणि अकोला जिल्ह्यात सुरू केला आहे. मार्केटमध्ये जे बियाणे १५० ते २०० रुपये किलो मिळते ते शेतकऱ्यांनी अर्ध्या किमतीत खरेदी केले. अकोला येथील महोत्सवात ९०० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
अकोला जिल्हा हा लहान जिल्हा आहे. तरी आशा महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे किमान २० कोटी रुपये वाचू शकतात. कुठलीच कंपनी बियाणे निर्मितीचे निकष तंतोतंत पालन करत नाही, कंपन्यांवर बॅन घातला पाहिजे आणि फक्त शेतकरी बियाणे विकेल अशी व्यवस्था तयार झाली पाहिजे असे ही बच्चू कडू म्हणाले.
तुटवड्याची कारणे
१. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे ‘सीड प्लॉट’ वाया गेले. त्याचा फटका बियाणे निर्मिती.
२. बरेचसे बियाणे बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीत नापास झाल्याने वाया गेले.
३. उन्हाळी सोयाबीनचा पर्याय निवडला. परंतू, मार्च-एप्रिल महिन्यातील तापमान वाढीचा फटका.