
मोबाईल ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारखा आता मोबाईल ही अत्यावश्यक गरज बनली. मोबाईलचा वापर आपण अनेक कामासाठी करत असतो. एका सर्व्हेक्षणानुसार भारतात लोक रोज चार तास मोबाईलवर घालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. असे असताना देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहे. कारण केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून देण्याता आलेल्या सूचनेनुसार देशातील 6 लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार आहे.
नेमकं कारण काय?
दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल कंपन्यांना सुमारे 6 लाख 80 हजार मोबाइल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले आहे. कारण हे कनेक्शन चुकीच्या, बनावट किंवा बनावट ओळख आणि पत्त्याच्या कागदपत्रांच्या आधारे घेतले असल्याची माहिती मिळत आहे. दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना तपासासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. 60 दिवसांच्या आत कंपन्यांनी पुन्हा पडताळणी न केल्यास हे संशयास्पद मोबाइल क्रमांक ब्लॉक केले जातील, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.
[read_also content=”गृहिणींचं बजेट कोलमडणार! कोथिंबीर, शेपू महागली; पाहा काय आहेत सध्याचे दर? https://www.navarashtra.com/maharashtra/vegetable-price-hike-in-maharashtra-and-coriander-shepu-rates-increased-537616.html”]
बनावट कागदपत्राद्वारे नंबर घेतल्याचा संशय
दूरसंचार विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे पडताळणी केल्यानंतर अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन्स संभाव्य फसव्या क्रमांक म्हणून ओळखले आहेत. हे असे कनेक्शन आहेत जे खोट्या किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून मिळवल्या गेल्याचा संशय आहे.
दूरसंचार विभागाने दिली दोन महिन्यांची मुदत
दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना 60 दिवसांच्या आत ओळखलेल्या मोबाईल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “दूरसंचार विभागाने अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन्स ओळखले आहेत. ओळखीचा पुरावा आणि पत्ता प्रमाणपत्र यांसारख्या बेकायदेशीर, खोट्या आणि बनावट केवायसी दस्तऐवजांचा वापर करून ही कनेक्शन मिळवल्याचा संशय आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
काय होणार कारवाई?
दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना या चिन्हांकित मोबाइल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांना ६० दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पडताळणीमध्ये कनेक्शन अयशस्वी झाल्यास ते बंद केले जाईल.
या एप्रिलमध्ये दूरसंचार विभागाने अनेक हजार कनेक्शन बंद केले होते. दूरसंचार विभागाने एप्रिलमध्ये पुन्हा पडताळणीसाठी 10,834 संशयास्पद मोबाइल क्रमांक ओळखले होते आणि यापैकी 8272 मोबाइल कनेक्शन पुनर्पडताळणी अयशस्वी झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. चुकीच्या किंवा बनावट केवायसी दस्तऐवजांचा वापर सूचित करते की हे मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीने प्राप्त केले गेले आहेत.