
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यातील देवानगंज परिसरात हिंदू धार्मिक कार्यक्रमादरम्यान लाऊडस्पीकरचा आवाज आणि धार्मिक झेंड्यांवरून दोन समुदायांमध्ये वाद झाला. सुरुवातीचा वाद वाढत जाऊन हिंसक संघर्षात बदलला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांच्या कारवाईत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
या घटनेनंतर प्रशासनाने संवेदनशील भागात जमावबंदी लागू केली. काही ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावरही निर्बंध घालण्यात आले. परिस्थिती पुन्हा बिघडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले.
Saudi-Pakistan-Turkey Pact : सौदीला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी अमेरिकेचा ‘इस्लामिक NATO’ डाव?
सुनसरीतील घटनेनंतर तणाव फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही. साप्तरी, सिराहा, धनुषा आणि पर्सा या भागांतही निदर्शने आणि हिंसक घटना घडल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला असून नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि लष्कराला तैनात करण्यात आले आहे.
मधेश प्रांतातील धार्मिक नेत्यांनी मात्र नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदू आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी धार्मिक आधारावर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न रोखण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी स्थानिक पातळीवर संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे.
नेपाळमधील हिंसाचाराचा संवेदनशील परिणाम भारत-नेपाळ सीमेवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय सीमावर्ती भागातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बिहारमधील मधुबनीसह सीमावर्ती भागात अधिक सतर्कता ठेवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरही देखरेख, गस्त आणि माहिती संकलन वाढवण्यात आले आहे.
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडून हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे आणि अफवा पसरत आहेत. काही ठिकाणी बाह्य शक्ती किंवा संघटनांच्या हस्तक्षेपाचे आरोप केले जात असले तरी पाकिस्तानी मौलाना किंवा ISIने हा हिंसाचार घडवून आणल्याचा ठोस सार्वजनिक पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे महत्त्वाचे आहे.