
nepal communal violence janakpur dhanusha curfew 3 dead 8 arrested marathi news
आपल्या शांतताप्रिय संस्कृतीसाठी आणि धार्मिक सौहार्दासाठी ओळखल्या जाणाऱ्या शेजारील देश नेपाळमध्ये अचानक जातीय तणावाचा भीषण भडका उडाला आहे. नेपाळच्या (Nepal) मधेश आणि कोशी प्रांतातील जनकपूर, धनुषा आणि सुनसरी या सीमावर्ती भागांमध्ये दोन धार्मिक समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. केवळ लाऊडस्पीकरचा आवाज आणि धार्मिक झेंडे फडकवण्यावरून सुरू झालेल्या या वादाने संपूर्ण मधेश प्रांतात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने जनकपूर शहरासह प्रमुख चार जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कडक संचारबंदी (Curfew) लागू केली आहे.
या संपूर्ण रक्तरंजित हिंसाचारात आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक नागरिक आणि पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळ पोलिसांनी अत्यंत आक्रमक कारवाई करत आतापर्यंत ८ मुख्य दंगलखोरांना तुरुंगात डांबले आहे. भारत-नेपाळ सीमेवरही या हिंसाचाराचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने भारतीय सीमेला लागून असलेल्या सर्लाही आणि पर्सा या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून येण्या-जाणाऱ्यांसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
या संपूर्ण वादाची ठिणगी गेल्या रविवारी रात्री कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यातील देवानगंज ग्रामीण नगरपालिकेच्या कप्तानगंज परिसरात पडली. एका स्थानिक मंदिराबाहेर कांवड यात्रेच्या (बोलबम) पूर्वसंध्येला लावलेल्या लाऊडस्पीकरच्या आवाजावरून दोन गटांत बाचाबाची झाली. यापूर्वीच वीजेच्या खांबावरील धार्मिक झेंडा हटवण्यावरून या दोन्ही समुदायांमध्ये सुप्त तणाव निर्माण झाला होता. हा किरकोळ वाद क्षणार्धात उग्र बनला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक सुरू झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : F35 Crash: सॅन दिएगोमध्ये USचे अत्याधुनिक फायटर जेट कोसळले; मिरामार एअर बेसजवळ भीषण अपघात, लष्कराकडून चौकशी सुरू
जमाव अनियंत्रित झाल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना आणि सशस्त्र पोलीस दलाला हवेत गोळीबार करावा लागला. मात्र, दुर्दैवाने या पोलीस कारवाईत आणि चकमकीत ओमप्रकाश मेहता नामक २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आणि हिंसाचाराची ही आग लागलीच शेजारच्या सिराहा, धनुषा, सप्तरी आणि पर्सा या जिल्ह्यांमध्ये वेगाने पसरली. सिराहा जिल्ह्यातील गोलबाजार येथे आंदोलकांनी केलेल्या निदर्शनादरम्यान गणेश यादव या १५ वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाला.
हिंसाचाराची तीव्रता वाढल्यामुळे मधेश प्रांताची राजधानी असलेल्या ऐतिहासिक जनकपूरधाम शहरात गुुरुवारी दुपारी ३:३० वाजेपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. प्रसिद्ध जानकी मंदिराचा परिसर, जनकपूरची बाजारपेठ आणि मुख्य रस्ते पूर्णपणे ओस पडले आहेत. पोलीस दलाबरोबरच सशस्त्र पोलीस बल (APF) आणि नेपाळी सैन्याच्या तुकड्यांना संवेदनशील भागात फ्लॅग मार्च करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
प्रशासनाने सुनसरी, धनुषा, सिराहा आणि सप्तरी या चार जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे कडक नियम लागू केले आहेत. सप्तरी जिल्ह्यातील राजबिराज नगरपालिकेच्या अनेक भागांत सकाळी ८ वाजेपासूनच कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास, रॅली काढण्यास किंवा आंदोलनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Spain Migrant: ‘घरे लुटली, रस्ते पेटवले’, सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय पडला महागात; स्थलांतरितांच्या हिंसाचाराने स्पेन हादरला
वाढत्या तणावाच्या या वातावरणात सिराहा जिल्ह्यातील लहान नगरपालिकेत एक अत्यंत भीषण घटना समोर आली. गुरुवारी रात्री गस्त घालत असताना अज्ञात हल्लेखोराने कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल नारद परियार यांच्यावर थेट प्राणघातक हल्ला केला. या गोळीबारात पोलिसांच्या मांडीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी पोलिसावर बिराटनगर येथील न्यूरो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे. या हिंसाचारामागे असलेल्या दंगलखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सिराहा जिल्ह्यातून ५ जणांना आणि धनुषा जिल्ह्यातून ३ जणांना अशा एकूण ८ हल्लेखोरांना हिंसाचार भडकवणे आणि दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये उफाळलेल्या या धार्मिक संघर्षावर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी गुरुवारी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या विशेष संदेशात नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शतकानुशतके चालत आलेला सामाजिक भाईचारा जपण्याचे आग्रही आवाहन केले. या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
मात्र, दुसरीकडे विरोधी पक्षांनी आणि स्थानिक नेत्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर वेळेवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवला आहे. घटनेच्या सुरुवातीच्या चार दिवसांत योग्य राजकीय पावले उचलली नसती तर हिंसाचार इतका पसरला नसता, अशी टीका होत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक असून सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे तणाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.