Talha slams Bilawal for backing Hafiz Saeed's extradition calls him pro-India
Bilawal Bhutto extradition : पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री व पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताच्या ताब्यात देण्याची शक्यता व्यक्त केली होती. या विधानानंतर दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद आणि इम्रान खान यांचा पक्ष PTI (पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ) यांनी बिलावल यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद याने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “बिलावल भुट्टो कोणत्या अधिकारात माझ्या वडिलांना भारताच्या ताब्यात देण्याची भाषा करतो? त्याला अशा बालिश आणि बेजबाबदार विधानांचा अधिकार नाही.” त्याने बिलावल यांच्यावर इस्लामविरोधी विचारांचे आरोप करत, त्यांना “खरे मुस्लिम नाहीत” असे ठामपणे म्हटले. तल्हाने असा दावाही केला की, भुट्टो कुटुंब भारताचे समर्थक आहे आणि त्यांच्या पक्षाने नेहमीच पाकिस्तानविरोधी कथा पाश्चिमात्य माध्यमांमध्ये पुढे रेटल्या आहेत.
फक्त तल्हाच नव्हे, तर इम्रान खान यांच्या PTI पक्षाने देखील या मुद्द्यावरून बिलावल भुट्टोंवर हल्ला चढवला आहे. पक्षाचे नेते म्हणाले की, “बिलावल यांना आंतरराष्ट्रीय आणि संवेदनशील मुद्द्यांवर बोलण्याची अक्कलच नाही. ते राजकारणात अपरिपक्व आणि बेजबाबदार आहेत.” PTI ने असेही म्हटले की, पाकिस्तानचा परराष्ट्र धोरणविषयक दृष्टिकोन अत्यंत गंभीर आणि समजूतदार असायला हवा, पण बिलावल यांनी दिलेल्या विधानामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk America Party : नवा पक्ष, नवा वाद! अमेरिकन राजकारणात ‘एलोन मस्क विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प’ महासंग्राम
बिलावल भुट्टो यांनी अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “पाकिस्तान भारतासोबत व्यापक चर्चा करण्यास तयार आहे. जर भारत न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करत असेल, तर पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताच्या स्वाधीन करण्याचा विचार करू शकतो.” त्यांनी असेही म्हटले की, “दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.” त्यांच्या या विधानानेच पाकिस्तानच्या राजकीय आणि कट्टरपंथी गोटात खळबळ उडवून दिली.
हाफिज सईद – लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. भारतातील 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार. सध्या पाकिस्तानात 33 वर्षांची शिक्षा भोगत आहे.
मसूद अझहर – जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेचा प्रमुख. पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यांसह अनेक दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड. तो सध्या अज्ञात ठिकाणी असल्याचे मानले जाते.
भारत या दोघांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानवर दबाव आणत आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय समुदायाने दोघांनाही जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांच्या सुरक्षेचा मोठा झोल! नो-फ्लाय झोनमध्ये घुसले विमान, नक्की उद्देश काय?
बिलावल भुट्टोंनी केलेल्या विधानामुळे पाकिस्तानात राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याचा विचार एका बाजूने आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक मानला जात असला तरी पाकिस्तानमधील कट्टर विचारसरणी आणि राजकीय विरोधक त्याचा तीव्र विरोध करत आहेत. ही संपूर्ण घटना केवळ पाकिस्तानातील दहशतवादविषयक राजकारणाचे चेहरे उघड करत नाही, तर राजकीय अपरिपक्वतेचेही प्रतिबिंब दर्शवते.