
विदर्भातले आणि विणकर समाजातले प्रमुख श्रेष्ठ संत धापेवाडा संस्थानचे पहिले गादीपुरुष असलेले श्री सदगुरू समर्थ कोलबास्वामी महाराज हे संत परंपरेचे पाइक आहेत. आध्यात्मिक सामर्थ्य आणि अलौकिक तेज असलेले कोलबास्वामी हे विणकर समाजाच्या हृदय सिंहासनावर ते आजही विराजमान आहेत. विणकर समाजात त्यांना देवपुरुषाचा दर्जा प्राप्त झाला आहे. असे हे अस्सल ग्रामीण क्षेत्रात असलेले धापेवाडा देवस्थान मठ चंद्रभागा नदीच्या किनार्याावरच्या उंच टेकाडावर निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे.
नागपूरपासून जवळपास ५० किलोमीटरवर ‘धापेवाडा’ हे गाव काटोल, कळमेश्वर, सावनेर या रम्य वनश्रीने नटलेल्या मार्गावर आहे. हिरवीगार शेती आणि संत्र्यांचे अनेक बगीचे सर्वमार्गानी लागतात. अधे मधे गाडी थांबवून आपण नागपूरी संत्र्याचा निसर्गानंद बगीच्यात घेऊ शकतो. याला लागुनच काही अंतरावर मध्यप्रदेशाची सीमा आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म याच धार्मिक गावात झालेला आहे.
पण आता गावानेसुद्धा काही प्रमाणात कात टाकलेली आहे. विकासाची अनेक कामे नितिजींनी सुरू केलेली आहे. महामार्गाचे आणि उड्डाणपुलांचे प्रचंड मोठे जाळे धापेवाड्याला तयार होत असले तरी गावाचे मुळ स्वरूप बदललेले नाही. गावातल्या बाजारातुनच रस्ता कोलबास्वामी मठाकडे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जातो. या लहानशा गावातले सर्वच लोक प्रचंड देवभोळे आहे. सकाळच्या प्रसन्न वेळेस भजन ,किर्तनात गावातले भाविक व्यस्त असतात. अशा या धापेवाड्याला पंढरपूरचे, येथल्या उत्तरवाहिनी नदीला चंद्रभागेचे आणि श्री विठ्ठल रुखमाई देवतेला पंढरपूरच्या देवतेचे महत्व आणि पावित्र्य प्राप्त झाले ते कोलबाजी महाराजांच्या विभूतिमत्वामुळेच…!
श्री सदगुरू कोलबास्वामींचा जन्म नागपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड तालुक्यातील ‘वेळा’ या गावी ज्येष्ठ शुद्ध शके १५७८ म्हणजे इ.स.१६५६ ला झाला. ते शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. विणकरी हा या गावचा प्रमुख व्यवसाय. या गावाला ‘बेला’सुद्धा म्हणतात. सात्विक कुटुंब असलेल्या रणदिवे परिवारातल्या कोलबास्वामींच्या वडिलांचे नाव देवाजी आणि आईचे नाव देवकाबाई असे होते. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला सूर्य मध्यानावर असताना भगवान विष्णुने देवाजीला दिलेल्या दृष्टांतानंतर कोलबाचा जन्म झाला. या गोंडस बाळाच्या जन्माच्या वेळेसच त्यांच्या शरीरावर शंख, चक्र, पद्म अशी सामुद्रिक शुभ लक्षणे असल्याने त्यांना अवतारी पुरुष समजण्यात आले.
गरीब लोकांना देवाजीने भरपूर दान धर्म केला. जन्मानंतर झालेल्या समारंभात बारा दिवस वाजंत्री वाद्य वाजवत होते आणि सुवासिनीच्या ओट्या भरल्या जात होत्या. आजही या परिवाराची पिढी त्यांच्या राहत्या घरी वास्तव्यास आहे. त्यावेळच्या प्रथेनुसार कोलबाचे लग्न बाराव्या वर्षी सहा-सात वर्षाची असलेल्या तुळजाबाई हिच्यासोबत झाले आणि त्यानंतर योग्य वेळेस म्हणजे सात-आठ वर्षांनी तुळजाबाईने आपल्या सासरी प्रवेश करून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर कोलबास्वामींची गंगाबाई आणि गुणाबाई यांच्या सोबत वडिलांच्या हयातीतच अजून दोन लग्ने झालीत.
पण त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे भरल्या परिवाराच्या किंवा बहुपत्नीत्वानुसार ही लग्ने झाली असावीत असा कयास आहे. कालांतराचे त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने संसाराची सर्व जबाबदारी सुखवस्तू असलेल्या कोलबास्वामी महाराजांवर येऊन पडली.
तो काळ अतिशय धामधुमीचा आणि प्रचंड राजकीय अस्थिरतेचा होता. शिवाजी महाराजांचा नुकताच मृत्यू झालेला होता आणि मुघल सम्राट औरंगजेब आपल्या लक्षावधी सैन्यासह दक्षिणेत तळ ठोकुन बसला होता. पंढरपूरच्या विभागात मराठे आणि मुघल यांच्या लढाया सातत्त्याने सुरू होत्या. त्या वेळेस कोलबास्वामींचे वय ३५ वर्षाचे होते. याच वेळेस कोलबास्वामींना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनावर इच्छा झाली आणि त्यांनी तयारी सुरू केली.
पण वेळ्यावरुन पंढरपुरला जाऊन परत सुखरूप येणे ही त्यावेळच्या परिस्थितीत अत्यंत कठीण गोष्ट होती. त्याच रात्री कोलबाजींना विठ्ठलाचे दर्शन झाले आणि ‘माझा ध्यास सोडून दे. शरीराला कष्ट देऊन तु इथे येऊ नको. मी स्वतः धापेवाड्याला येत आहे. तू तेथे जा माझा शोध घे आणि वास्तव्य कर’ असे सांगितले. त्यानंतर कोलबाने पंढरपूरला जाण्याचा विचार रद्द केला. पण व्यवसाय डबघाईला आला, आर्थिक परिस्थिति बिघडली… जवळ पैसा नव्हता आणि अशा विचित्र परिस्थितीत त्यांनी वेळा हे गाव सोडले आणि ते आपल्या तिन्ही पत्नींना सोबत घेऊन आताच्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाड्यास स्थायिक झालेत. या तिघिंमधे प्रचंड एकोपा होता. हे नवीन ठिकाण निवडण्याचे कारण पांडुरंगाचा झालेला दृष्टान्त, धापेवाड्यास राहत असलेला प्रचंडमोठा विणकर समाज, विणकरांची बाजारपेठ आणि विठ्ठल-रुखमाईचा शोध..!
याच ठिकाणी त्यांची धर्मशेट्टीबाबा या गृहस्थाश्रमी असलेल्या पण संसारातून अलिप्त असलेल्या सत्पुरुषाशी भेट झाली. ते शंकराचार्यांच्या परंपरेतील महान योगी आणि सिद्ध पुरुष होते. शृंगेरी मठाच्या परंपरेतले त्रोटकाचार्यांचे शिष्य जयदेवपुरी-गंगापुरी-चूडामणी-मकरंदपुरी आणि धर्मशेट्टीबाबा अशीही शिष्य परंपरा आहे. हिंदुधर्माची महान शिकवण आणि योगशास्त्राचे धडे त्यांनी कोलबास्वामींना दिले.
या वेळेस कोलबास्वामींचा अभिषेक करून आणि हातात तलवार देऊन राजवस्त्रे परिधान करण्यात आली. ही तलवार म्हणजे क्षत्रिय वृत्तीचे निदर्शक असून त्या वेळची अराजकता व यवनांचे आक्रमण यातून समाजाचे संरक्षण करण्याचा संदेश त्यांनी विणकर समाजाला दिला. वयाच्या सत्तर वर्षांनंतर धर्मशेट्टीबाबा वसंत पंचमीला बद्रीनाथच्या दिशेने उत्तरेकडे निघुन गेले ते कायमचेच..!
खापा, वाकोडी, अहमदनगर, ठाणे, पुणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना करुन नीतिनियम घालून दिले. भयंकर दुष्काळामध्ये ‘सदावर्त’ राबवून लोकांना जीवनदान दिले. यामुळेच की काय कोलबास्वामींकरिता पंढरपूरचा विठ्ठल धापेवाड्यात चंद्राभागा नदीमधून धापेवाड्याला म्हणजे धर्मपुरीला मूर्तिरूपाने अवतरला. भक्तांच्या सोयीसाठी तेथे भोसल्यांचे कारभारी ‘उमाजी आबा’ यांनी विठ्ठल-रुखमाईचे सुरेख मंदिर बांधले. आषाढी एकादशी आणि वसंतपंचमीला जणूकाही पंढरपूरच धापेवाड्याला अवरते.
नागपूरचे प्रसिद्ध अधिवक्ता अॅड. कै.न.ल. बेलेकर यांनी सखोल चिंतन करून १९६५ साली कोलबास्वामींचे जीवनचरित्र प्रसिद्ध करून समाजाला परिचय करून दिला. या पुस्तकाच्या संपादित आवृत्तीचे प्रकाशनसुद्धा झाले. श्री रमेश उमाठे आणि श्री ओमप्रकाश पाठराबे यांनी हे पुस्तक संपादित केले .
महाभारत कालीन आदासाचा प्रसिद्ध गणपती, सावंगीचा कै. भैय्याजी महाराजांचा ताज आश्रम, काही अंतरावर असलेले झोपलेल्या हनुमानाचे जामसावळी, जुन्या स्मशानातले भगवान शंकराचे कपिलेश्वर अशी अनेक निसर्गरम्य धार्मिक स्थळे धापेवाड्याच्या जवळपास अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर बघायला मिळतात.
असे हे दीर्घायुषी असलेले कोलबास्वामी १०५ वर्षे जगले..! सन १७६१ च्या सोमवारी तिसर्याग प्रहरी कोलबास्वामींनी पद्मासन घातले आणि स्वत:चे प्राण पंचतत्वात विलीन केले. आज धापेवाड्याल्या कोलबास्वामींच्या राहत्या घरात त्यांची समाधी आहे. त्यांच्या पिढीतल्या काशीनाथ महाराज, माधवनाथ महाराज, विठोबाजी महाराज आणि यादवराव महाराज यांच्यासुद्धा समाध्या या घरात बघायला मिळतात. सध्या कोलबास्वामींच्या पिढीतील सातवे महाराज श्रीहरीबापु वेळेकर हे गादी पुरुष आहेत आणि बरेचदा त्यांच्या दर्शनाचा योग धापेवाड्याला येत असतो ..! अशी ही धर्मपुरी..! असे हे विदर्भाचे पंढरपूर असलेले कोलबास्वामींचे धापेवाडा..!
श्रीकांत पवनीकर (sppshrikant81@gmail.com)