Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाट्यजागर : ‘वंदे मातरम्’ने मंतरलेली नाटके!

१५ ऑगस्ट १९४७ हा सुवर्णअक्षरांनी सजविलेला दिवस. एका प्रदीर्घ संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी नाट्यक्षेत्रानेही मोलाची कामगिरी पार पाडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्याची एका दमात दखल घेता येणं शक्य नसले तरीही या वाटेवरल्या काही नाटकांना उजाळा देणं काळाची गरज आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 07, 2022 | 06:00 AM
plays performed by vande mataram nrvb

plays performed by vande mataram nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नाटककार विश्वनाथ नाशिककर यांचे १८७० साली आलेले ‘झांशीच्या राणीचं नाटक’. सत्य इतिहासावरले कथानक. पण यातील रणसंग्राम हा प्रेरणादायी ठरला. त्यात वर्तमानकाळात लादलेले ब्रिटीशयुग आणि त्याविरुद्धचा संताप हा रसिकांना जाणवला. दुसरे एक नाटककार शंकर मोरो रानडे यांनी ब्रिटीशांच्या दबावाची पर्वा न करता ‘गौरन्याय मीमांसा’ हे नाटक लिहीले होते. गोऱ्या अधिकारी, कर्मचारी या विरुद्ध कुठलाही खटला हा न्यायालयात चालविता येत नव्हता. त्या विरोधातच ब्रिटिश न्यायप्रशासनावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. या नाटकाने ब्रिटिश मंडळीही थक्क झाली. नाटकांकडे त्यांचे लक्ष वेढले गेले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तीन नाटके. एक उ:शाप (१९२७), दुसरे संन्यस्तखङग (१९३१) आणि तिसरे संगीत उत्तरक्रिया (१९३३) उ:शापमध्ये हिंदू-मुस्लीम दंग्यांची पार्श्वभूमी तर उत्तरक्रिया यात पानीपतचा पराभवाच्या वेदना आणि ‘संन्यस्तखङग’ यात हिंदुस्थानला स्वातंत्र्य हे चर्चा किंवा असहकाराच्या आंदोलनामुळे नव्हे तर सशस्त्र क्रांतीने मिळू शकेल हेच मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘कीचकवध’ हे नाटक. कथानक पुराणातलं महाभारतातील गोष्ट. पण त्याची प्रतिकात्मकता नेमकी सांभाळलेली. जी त्यावेळी हिंदुस्थानात आलेला गव्हर्नर लॉर्ड कर्झन कीचक आणि पारतंत्र्यातील जनता म्हणजे सैरंध्री. रसिकांना क्षणोक्षणी जाणवते. १९०७ च्या सुमारास याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली तर पुण्यात महाराष्ट्र नाटक मंडळीने त्याचा शुभारंभ केला. ‘कीचकवधा’च्या पौराणिक कथेला दिलेले तत्कालीन रूपक हे फिट्ट शोभून दिसले. त्यातील संवाद आणि एकेक व्यक्तिरेखा या अभ्यासाचा विषयच आहे. कारण त्यातले नाट्य हे पकड घेते. प्रसंगी त्या काळचा विचार करता थक्क करून सोडते. हे नाटक म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातले एक वैचारिक मंथनच ठरलं.

खाडीलकरांचेच दुसरे एक नाटक. जे १९०९ साली रंगभूमीवर गाजले तेही ब्रिटिश सत्तेला हादरून सोडणारे होते. पेशवाईतले कथानक त्यात गुंतलेले. नारायण पेशवे यांची हत्या, बारभाईंचे कपटकारस्थान, राघोबा-आनंदीबाई यांच्यातले वादळ, रामशास्त्रींचा निर्णय अशा एकेक घटनांनी परिपूर्ण.

पेशवाईचा इतिहास जरी असला तरी काहीदा ते घराघरातलं कुटुंब नाट्यही वाटलं आणि या नाट्याचा प्रतिकात्मक अर्थ हा ‘ब्रिटीशांपासून सावधान’ करण्यासाठी निघत होता. आपण जर असेच एकमेकांशी आज भांडत राहीलो तर हे गोरेसाहेब लवकर देश सोडणार नाहीत असा संदेश त्यातून खाडीलकरांनी दिला. त्यावेळी सुरत मुक्कामी झालेले काँग्रेसचे अधिवेशन आणि परस्परांमधले वादविवाद हे पराकोटीला पोहचले होते. त्या पार्श्वभूमीवर यातील नाट्य हे रसिकांना जागं करणारं ठरलं.

मराठी नाटकांनी स्वातंत्र्यासाठी केवळ नाट्यप्रयोगातून योगदान दिले इतपतच विषय मर्यादित नाही तर अनेक नाटकांच्या प्रयोगातून मिळालेली रक्कम ही स्वातंत्र्य चळवळीसाठी देणगी म्हणूनही दिली. १९२१ साली खाडीलकरांचे पदांनी गाजलेले ‘मानापमान’चा प्रयोग खास आयोजित करण्यात आला. त्यात बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या भूमिका. त्यातून मिळालेली साडेसतरा हजार रुपयांची रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, हार हे सारं काही महात्मा गांधी यांच्या समक्ष टिळक स्वराज्य फंडाला अर्पण करण्यात आलं.

नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांच्या लेखणीतून साकार झालेले ‘संगीत कृष्ण कांचन’ हे याच वाटेवरलं नाट्य. जे कोल्हापूरात वाजत-गाजत १९१७ साली रंगभूमीवर आले. राजदरबारची एक काल्पनिक कथा. ज्यातून ‘देश हाच आपला देव आणि स्वातंत्र्य हेच धर्म!’ असा मेसेज देण्याचा प्रयत्न होता. आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजेच, असेही सारंगदेव दरबारातील नाट्यपूर्ण प्रसंगातून मांडले होते. हे नाटक संगीतनाटक होते. रसिकांची त्याकाळची आवड-निवड ही लक्षात घेऊनच त्याचे सादरीकरण हे झाले असले तरीही ‘राष्ट्रधर्मा’चा विचार ठामपणे नजरेत भरतो.

नाटककार वा. र. शिरवळकर यांचे राणा ‘भीमदेव’ हे नाटक. तो १८९२ चा सुमार. ऐतिहासिक कथानक असलं तरी काल्पनिक. त्यात एके ठिकाणी भीमदेव म्हणतो – ‘हे स्वर्गस्थ देवांनो, स्वर्गाची कपाटे फोडून तुमच्या कानांवर अजून जाऊन आदळत नाहीत काय?… गनिमांचे हात छाटून पुढे पाऊल टाकू! आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे स्मरण करा! घनघोर रणसंग्राम करा! आणि कंबरेस लटकविलेली ही तलवार हातात धरून शत्रूंच्या रक्ताने रणमैदान भिडवून टाका! सूड! सूड! आणि सूड!’ – हे स्वगत म्हणजे ‘नटसम्राट’च्या स्वगताची आठवण हमखास येते. अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा ही ‘भीमदेव’च्या संहितेतून येते.

मराठी नाटकांनी अनेक सांस्कृतिक, सामाजिक विषय मराठी रंगभूमीला गेली पावणेदोनशे वर्षे दिलेत. प्रत्येक वळणावर नाटकांनी प्रासंगिकता जपली. त्याकाळचे भान ठेवले. अगदी धार्मिक, पौराणिक, कौटुंबिक विषयांपासून ते आंतरराष्ट्रीय विषयांचाही समावेश झाला. त्यात स्वातंत्र्यलढ्याच्या कालखंडात बंदीचा दबाव असूनही थेट भिडण्याचे बळ हेदेखील रंगधर्मींनी दाखविले हे विसरून चालणार नाही.

नाटकात थरारनाट्य असणारी एक घटना. ज्याची नोंद नाट्य इतिहासात घेतली जाते. नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर ए. टी. जॅक्सन याच्या वधाची गोष्ट. एक सत्यघटना आणि देशभक्तीचे दर्शन घडविणारी. १९०९ साली नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये ‘संगीत शारदां’चा प्रयोग. बालगंधर्व प्रमुख भूमिकेत. प्रयोग हाऊसफुल्ल. नाटक सुरू झाले आणि अनंत कान्हेरे या फक्त १९ वर्षाच्या युवकाने नाट्यगृहात जॅक्सनवर गोळ्या झाडल्या. जॅक्सन कोसळला… सशक्त क्रांतीची ठिणगी ‘शारदा’ नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने पडली. ब्रिटिश सरकार हादरून गेले!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो काळ पेटला होता त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतेक नाटककारांनी आपल्या लेखण्याही पेटत्या ठेवल्या. राजकारण, समाजसेवा आणि देशभक्ती याचे दर्शन त्यांच्या शंभरावर नाटकातून होत होते. नाट्यसंस्थाही स्वातंत्र्यासाठी भारावलेल्या होत्या. अगदी नावापासूनच शोध घेतला तर त्याचा प्रत्यय येतो. लोकमान्य नाटक मंडळी, बाल (टिळक) मोहन (गांधी) नाटक कंपनी, बळवंत नाटक कंपनी एक ना दोन नाट्यनिर्मिती संस्थेचे टायटलही स्वातंत्र्यलढायला पूरक होते, त्याकाळचे नेतेही नाटकांशी नाते जुळवून चळवळ चालवित होते. टिळकांनी ‘बालगंधर्वां’चे नामकरण केले. तर शाहू महाराजांनी नाटक जगावं म्हणून वेळोवेळी अर्थसहाय्य केले. महाराष्ट्रभरात प्रयोगांसाठी भटकंती करणाऱ्या रंगकर्मींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या चळवळीला हातभार समर्थपणे लावला. त्याकाळी आजच्यासारखी संपर्काची साधने नसल्याने नाटकवाल्यांचा हक्काचा आधारच अनेक राष्ट्रभक्त नेत्यांना, कार्यकर्त्यांना मिळाला.

मामा वरेरकर यांचे ‘सत्तेचे गुलाम’ हे नाट्य मातृभूमी वंदना ठरली. १९२२ साली नाट्य रंगभूमीवर आले. कथानक इंग्रजांच्या विरुद्ध नव्हते किंवा स्वातंत्र्यलढ्याशीही संबंध तसा जराही नव्हता पण नाटकाचा पडदा पडतांना सर्वांनी उभं राहून प्रथमच जाहीर ‘वंदे मातरम्’ या गीताचं गायन सुरू केलं. मनोरंजनासोबतच देशाला वंदन नाटकातून करण्यात आलं. त्यानंतर हा पायंडा पडला.
इंग्रजांविरुद्ध प्रतिकात्मक नाटकांनी रंगभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळात एकच गर्दी केली होती. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सतर्क करण्यासाठी नाटककारांनी आपली लेखणी सज्ज ठेवलेली. पत्रकार, नाटककार खाडीलकर यांच्या पाळतीवर तर त्यावेळी ब्रिटिश गुप्तहेर असायचे. त्यांच्या नाटकांवर कडवी नजर होती. मराठी रंगभूमी स्वातंत्र्यासाठी खर्ची पडली होती, हे नाकारून चालणार नाही.

मराठी नाटकांचे जन्मदाते म्हणून गुरुस्थानी असलेले विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’पासून सुरू झालेला हा प्रवास. वर्ष १८४३. त्यांनी ‘नाटक म्हणजे राष्ट्रीय करमणूक!’ अशी मराठी नाटकांची सरळ व्याख्या केली होती. जी सत्य ठरली. ब्रिटिशांच्या काळात देशात संस्थानिक राजे-महाराजे होते. जे राजदरबारात मानाने मिरवत असायचे ‘राजगवई’ हा बहुमानही त्यांना होता.

राजाश्रयापासून सुरू झालेला हा कलेचा प्रवास पुढे संगीतनाटकांपर्यंत पोहचला. ‘राजाश्रय’ हे जनाधार असा हा प्रवास जो भारतीय जीवनशैलीतला एक अविभाज्य असा घटकच ठरलाय. स्वातंत्र्यकाळातील नाटके ही त्यात एक दिपस्तंभासारखी साक्षीदार बनली. ‘वंदे मातरम्’ची जादू एक कालखंडाने अनुभवली.

संजय डहाळे

sanjaydahale33@gmail.com

Web Title: Plays performed by vande mataram nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • Navarashtra Update
  • Plays

संबंधित बातम्या

Navarashtra Woman Awards : भारती मुथा यांना नवभारत नवराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान
1

Navarashtra Woman Awards : भारती मुथा यांना नवभारत नवराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
2

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

“डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…”, सचिन खेडेकरांच्या ‘भूमिका’ नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट
3

“डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…”, सचिन खेडेकरांच्या ‘भूमिका’ नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

World Theatre Day 2025: शेक्सपियरच्याआधी 1900 वर्षांपूर्वीच भारतात रंगभूमीचा उगम, सनातन धर्मातील पाचवा वेद ‘नाट्यशास्त्र’
4

World Theatre Day 2025: शेक्सपियरच्याआधी 1900 वर्षांपूर्वीच भारतात रंगभूमीचा उगम, सनातन धर्मातील पाचवा वेद ‘नाट्यशास्त्र’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.