
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य बोर्डासह सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळांच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्या आहेत. हा काळ विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तणावपूर्ण असतो. अभ्यासाची मोठी व्याप्ती, अपेक्षांचा दबाव आणि चांगले गुण मिळवण्याची धडपड यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चिंता आणि भीती जाणवते. अनेकदा पुरेशी उजळणी करूनही पेपर लिहिताना आत्मविश्वास कमी पडतो. मात्र योग्य नियोजन आणि काही सोप्या सवयी अंगीकारल्यास हा तणाव नक्कीच कमी करता येऊ शकतो.
अभ्यासाचे नियोजन ठेवा
मोठा अभ्यासक्रम पाहून घाबरून जाण्याऐवजी त्याचे छोटे भाग करा. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करा. दिवसाचे ठराविक तास अभ्यासासाठी राखून ठेवा आणि त्यानुसार दैनंदिन लक्ष्य निश्चित करा. कठीण वाटणाऱ्या विषयांना प्राधान्य द्या. ‘आज काय पूर्ण करायचे?’ हे स्पष्ट ठेवल्यास अभ्यास व्यवस्थित पार पडतो आणि आत्मविश्वास वाढतो.
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी झोप कमी करतात किंवा जेवण वेळेवर घेत नाहीत. मात्र चांगली झोप, संतुलित आहार आणि नियमित हलका व्यायाम हे तितकेच महत्त्वाचे आहे. पुरेशी विश्रांती घेतल्यास मेंदू अधिक चांगल्या प्रकारे काम करतो आणि एकाग्रता वाढते. दिवसातून थोडा वेळ चालणे, प्राणायाम किंवा ध्यान करण्यासाठी द्या. यामुळे मन शांत राहते आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येते.
आउटडोअर आणि ब्रेक आवश्यक
सतत अभ्यास केल्याने थकवा आणि कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे ठराविक वेळेनंतर छोटा ब्रेक घ्या. घराबाहेर थोडे फिरणे, हलका खेळ खेळणे किंवा आवडीचे संगीत ऐकणे यामुळे मन ताजेतवाने होते. मात्र ब्रेकचा वेळ मर्यादित ठेवा, जेणेकरून अभ्यासाची लय बिघडणार नाही.
कुटुंब व मित्रांचा आधार घ्या
तणावाच्या काळात कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. आपल्या मनातील भीती किंवा शंका त्यांच्याशी मोकळेपणाने शेअर करा. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास वाढतो. गरज भासल्यास शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या. एखादा विषय कठीण वाटत असल्यास तो समजून घेण्यासाठी मदत मागण्यात संकोच करू नका.
मॉक टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिका सोडवा
बोर्ड परीक्षेच्या तयारीत मॉक टेस्ट आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे प्रश्नांचा पॅटर्न समजतो, वेळेचे व्यवस्थापन करता येते आणि पेपर लिहिण्याचा सराव होतो. ठराविक वेळेत पूर्ण पेपर सोडवण्याचा सराव केल्यास प्रत्यक्ष परीक्षेत घाई होत नाही. परीक्षा ही आयुष्यातील एक टप्पा आहे, अंतिम निर्णय नाही. सकारात्मक विचार, योग्य नियोजन आणि स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते. ‘स्ट्रेस फ्री’ राहून तयारी करा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या. यश तुमचेच असेल.