
neet controversy
NEET Result Controversy: देशभरात नीट परीक्षेच्या (NEET) पेपरफुटीवरून सुरू असलेला गोंधळ अद्यापही शमलेला नाही. एकीकडे राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक यांचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे नीटच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना निकालानंतर मोठा मानसिक धक्का बसला असून, पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीने नुकतीच पार पडलेली नीटची परीक्षा दिली होती. वर्षभर दिवसातील १८-१८ तास अभ्यास करणारी ज्ञानेश्वरी टॉपरच्या शर्यतीत होती. परीक्षा संपल्यानंतर अधिकृत आन्सर की नुसार गुण तपासले असता, तिला ७०० पेक्षा जास्त गुण मिळत होते. त्यामुळे तिने थेट ‘एम्स दिल्ली’मध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, प्रत्यक्षात स्कोअरकार्ड हातात आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्ञानेश्वरीला थेट ८७ गुण दाखवण्यात आले आहेत. हा निकाल पाहून ज्ञानेश्वरी आणि तिच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.
ज्ञानेश्वरीच्या आई मीरा पवार यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर (NTA) गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलीला चुकीची ओएमआर (OMR) शीट देण्यात आली आहे. तिने जेवण सोडून वर्षभर अभ्यास केला. तिला ७०० गुण मिळायला हवे होते. एनटीएने (NTA) आम्हाला आमची ओएमआर शीट लाईव्हमध्ये दाखवावी,” अशी आक्रमक मागणी तिने केली आहे.
बीडमध्ये केवळ ज्ञानेश्वरीच नाही, तर सोहम गवते या विद्यार्थ्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. सोहमने उत्तरपत्रिका आणि आन्सर की तपासल्यानंतर त्याला किमान ५२२ गुण मिळतील अशी पक्की खात्री होती. मात्र, अंतिम निकालात सोहमच्या स्कोअरकार्डवर अवघे ९५ गुण दिसत आहेत. हा धक्का सहन न झाल्याने सोहम बराच वेळ कोणाशीच बोलला नाही. या दोन्ही प्रकरणांमुळे बीड जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.