
qs
QS World University Rankings 2027: भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेने जागतिक स्तरावर आपली उपस्थिती आणखी मजबूत केली आहे. ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७’ (QS World University Ranking 2027) मध्ये भारताच्या ५२ उच्च शिक्षण संस्थांना स्थान मिळाले आहे, तर २०१५ मध्ये हा आकडा केवळ ११ होता. केंद्र सरकारनुसार, गेल्या दशकात उच्च शिक्षणाचा झालेला विस्तार आणि संस्थांमध्ये करण्यात आलेल्या विविध सुधारणांचा सकारात्मक परिणाम जागतिक क्रमवारीत भारताच्या स्थितीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, क्यूएस रँकिंगमध्ये समाविष्ट होणाऱ्या भारतीय संस्थांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच अनेक संस्थांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. ५२ भारतीय संस्थांपैकी २६ संस्थांची रँकिंग सुधारली आहे, ९ संस्था त्यांच्या मागील स्थितीवर कायम राहिल्या असून १५ संस्थांच्या रँकिंगमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. तसेच, २ संस्थांनी पहिल्यांदाच या क्रमवारीत स्थान मिळवले आहे.
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२७ मध्ये आयआयटी दिल्ली हा भारताचा सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवणारा संस्थान ठरला आहे. आयआयटी दिल्लीने ५ स्थानांची झेप घेत जागतिक स्तरावर ११८ वा क्रमांक पटकावला आहे. यानंतर आयआयटी बॉम्बे १३४ व्या, आयआयटी मद्रास १७० व्या, आयआयटी खरगपूर २०५ व्या आणि आयआयएससी बंगळुरू २२१ व्या स्थानावर राहिले. मागील वर्षाच्या तुलनेत आयआयटी बॉम्बेची रँकिंग ५ स्थानांनी खाली आली आहे, तर आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूरच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.
यावेळी जागतिक क्रमवारीत भारताची उत्तम कामगिरी केवळ आयआयटी आणि आयआयएससी पुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक नॉन-आयआयटी संस्थांनीही क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. उदाहरणार्थ, बिट्स पिलानी ९३ स्थानांनी वर जात ५७५ व्या स्थानावर पोहोचले, तर व्हीआयटी (VIT) ने ९४ स्थानांची झेप घेत ५९७ वा क्रमांक मिळवला. शूलिनी विद्यापीठ (Shoolini University) देखील ५१ स्थानांनी वर जात ४५२ व्या स्थानावर पोहोचले.
UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी!
याशिवाय, आयआयटी हैदराबादच्या रँकिंगमध्ये ७६ स्थानांची सुधारणा झाली आहे. जामिया मिलिया इस्लामियानेही ७५ हून अधिक स्थानांची मजल मारत ६८६ वा क्रमांक पटकावला. क्रमवारीत समाविष्ट असलेल्या एकूण ५२ भारतीय संस्थांपैकी १८ संस्थांनी त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये १३ नॉन-आयआयटी संस्थांचा समावेश आहे.
भारताच्या जागतिक क्रमवारीतील वाढत्या उपस्थितीचे श्रेय केंद्र सरकारने ‘एनआयआरएफ’ (NIRF) आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणांना दिले आहे. एनआयआरएफची सुरुवात २०१५ मध्ये झाली. या अंतर्गत उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन अध्यापन व संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक सराव, पदवीचे परिणाम, पोहोच आणि सर्वसमावेशकता आणि सहकाऱ्यांचे मत यांसारख्या निकषांवर केले जाते. याशिवाय, सरकारने जागतिक क्रमवारीत भारतीय संस्थांच्या चांगल्या कामगिरीमागे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP 2020) सह अनेक उपक्रमांनाही महत्त्वाचे ठरवले आहे.