
Accident News: सुपौलमध्ये भरधाव कारने कीर्तन करणाऱ्या भाविकांना चिरडले; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
कीर्तन सुरू असतानाच कार घुसली
मंदिर परिसरात काही नागरिक धार्मिक कार्यक्रमानिमित्त रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेली कार अचानक अनियंत्रित झाली आणि तिने कीर्तन करणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार सुमारे ५० मीटर पुढे जाऊन रस्त्यालगत असलेल्या एका दुकानात घुसली. अपघातानंतर परिसरात एकच आरडाओरड सुरू झाली. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
Hyderabad Accident: सूर्यापेटमध्ये भीषण बस अपघात; लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडक, ६ ठार
तिघांचा घटनास्थळीच मृत्यू
या दुर्घटनेत तिलो दास (६५), राजो दास (५०) आणि सुरेंद्र यादव (४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिलो दास आणि राजो दास हे वॉर्ड क्रमांक १२ मधील रहिवासी होते, तर सुरेंद्र यादव वॉर्ड क्रमांक १५ मध्ये राहत असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पिपरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
अपघातात भुवनेश्वरी यादव, रामचंद्र यादव आणि कृष्णा साह हे तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या पाच झाली आहे. एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत्यूच्या बातमीने रुग्णालयात गोंधळ
पाच जणांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनास्थळापासून सदर रुग्णालयापर्यंत शोकाकुल वातावरण होते. उपचारादरम्यान दोन जखमींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच संतप्त नातेवाइकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाइकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
कार ताब्यात; चालकाच्या भूमिकेची चौकशी
पिपरा पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि चालकाची भूमिका काय होती, याचा तपास केला जात आहे. भरधाव वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा हे अपघातामागील संभाव्य कारण आहे का, याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत
या भीषण दुर्घटनेबद्दल सुपौलचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून पीडित कुटुंबांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.