
दोन वर्षे करत होता पाठलाग, अपहरण अन् अखेर खून... शिक्षिकेची हत्या करणाऱ्या सनकीची संपूर्ण कहाणी
दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद
दोन वर्षांपासून पाठलाग करत होता…
माहितीनुसार, हत्या करणारा आरोपी जवळपास २ वर्षांपासून महिला शिक्षिकेचा पाठलाग करत होता. अखेर आपल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. शिक्षिकेच्या कुटुंबाने सांगितले की, आरोपी साधारण दोन वर्षांपासून संध्याचा पाठलाग करत होता. यावर्षीच्या सुरुवातीलाच त्याने कथितरित्या संध्याचे तिच्या घरातून अपहरण देखील केले होते. यानंतर संध्याच्या पतीसोबत त्यांची हाणामारी झाली आणि कुटुंबाने आरोपीला दूर राहण्याचा इशारा दिला. इतकं करुनही आरोपी अमित संध्याचा पाठलाग सोडत नव्हता. तिने एकदा पोलिस ठाण्यास तक्रार दाखल करण्याचीही धमकी आरोपी अमितला दिली होती.
संध्यासोबत करायचे होते लग्न…
संध्या विवाहित असूनही आरोपी अमित पुन्हा पुन्हा संध्याला फोन करुन तिला त्रास देत असायचा. या सर्वांना कंटाळून संध्याच्या पतीने एक वर्षांआधी तिचा फोन देखील तोडून टाकला. यानंतरही अमित तिचा पाठलाग करु लागला. संध्या आधीपासून विवाहित आहे हे माहिती असूनही अमितला तिच्यासोबत लग्न करायाचे होते ज्यासाठी तो तिला गेल्या दोन वर्षापासून त्रास देत होता.
एकतर्फी प्रेमात झाला सनकी
आरोपी अमिक एकतर्फी प्रेमात इतका बुडाला होता की अखेर संध्याला मारण्याचा त्याने निर्णय घेतला. ती आपली होऊ शकत नाही तर तिला इतर कुणाचीही होऊ देणार नाही या विचाराने तो शाळेत घुसला आणि चाकूच्या धारदार वाराने त्याने शिक्षिकेचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, तोंडावर कापड गुडांळून तो शाळेत घुसला आणि संध्याला भेटण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आरोपीने संध्याच्या पतीचे नाव (विक्की) सांगत शाळेत प्रवेश घेतला होता. ३ ऑगस्टच्या सकाळी ही घटना घडली. संध्या जशी बाहेर आली तसेच आरोपीने तिला जवळ ओढले आणि हातातील चाकूने तिच्यावर वार करायला सुरुवात केली. आरोपीने २० हून अधिक वेळा शिक्षिकेवर चाकूने वार केले ज्यात ती रक्तबंबाळ होत जमिनीवर पडली. यानंतर आरोपी तिथून चाकूसहित फरार झाला.
पोलिसांनी तक्रार दाखल केली
पतीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २१ वर्षीय अमितवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. चाैकशीत समोर आले की, संध्या आणि अमित यांची गावातील एका प्रायव्हेट स्कूलमध्ये ओळख झाली. अमितचे तिच्यावर प्रेम जडले पण संध्या त्याच्यापासून दूर राहत होती. अमितच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिस ठाण्यात यापूर्वी तक्रार देखील दाखल केली होती. तथापि, जाहीररित्या माफी मागितल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य झाले आणि प्रश्न तिथेच सोडवण्यात आला. पुन्हा त्रास देणार नाही असे खोटे आश्वासन देत अमितने त्यावेळी माफी मागितली पण यामुळे त्याच्या मनातील द्वेष आणखी वाढला होता. हाच राग मनात घेऊन तो शाळेत पोहचला आणि चाकूने वार करत त्याने संध्याचा खून केला.