भिवंडी : एखाद्या अनोळखी व्यक्तीने पत्ता विचारल्यावर त्याला मदत करणं आता आपल्याच जीवावर बेतू शकतं. डोळ्यांनी हिप्नोटाईज करुन अपहरण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. माणकोली-डोंबिवली दरम्यानच्या पुलाजवळून अपहरण झालेला शाळकरी मुलगा थेट नवी दिल्लीत गजबजलेल्या सदर बाजारातील एका दुकानात सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मुलाचे व्हॉट्स अॅपवरून लोकेशन सापडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी थेट माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर कपिल पाटील यांनी तत्काळ नवी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पोलिसांसह मुलाचा शोध घेण्यास सांगितल्यानंतर, अवघ्या तासाभरात बाजारातील एका दुकानात मुलगा आढळला. व्हिडीओ कॉलवरून मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
भिवंडी तालुक्यातील वेहळे येथील रुद्र निलेश भोईर हा दहावीतील मुलगा ४ जुलै रोजी माणकोली-डोंबिवली पुलाजवळील कॅफेमध्ये गेला होता. त्याठिकाणी सूट घातलेल्या एका व्यक्तीबरोबर तो बोलत होता. त्या व्यक्तीबरोबर आणखी दोघे जण होते. त्यानंतर चौघेही बोरिवली येथे गेले. बोरिवली येथे रुद्र याला रेल्वेचे तिकीट काढण्यास सांगितले गेले. त्यानंतर ते रेल्वेच्या जनरल डब्याने नवी दिल्लीला गेले. नवी दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसेपर्यंतचा काहीसा घटनाक्रम रुद्र याला आठवत आहे. मात्र, त्यानंतर तो तेथील बाजारात कसा पोचला, हे त्याला ठाऊक नाही.
रुद्र हा हरविला असल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेऊन ठिकठिकाणी शोध सुरू केला. त्याचे वडील निलेश भोईर हे पंढरपूर येथे यात्रेला गेले होते. ते तातडीने घरी परतले. मात्र, तीन दिवस त्यांना मुलाचा शोध घेण्यास यश आले नाही. दरम्यानच्या काळात ७ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रुद्रचे व्हॉट्स अॅपवरून लोकेशन समजले. निलेश भोईर यांच्यासह नातेवाईकांनी तत्काळ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहायक राम माळी यांच्याबरोबर संपर्क साधला. तेच ते कपिल पाटील यांची भेट घेण्यासाठी निवासस्थानी आले. तसेच नवी दिल्ली येथील पोलिसांमार्फत तातडीने शोध घेण्याची विनंती केली. या प्रकाराची कपिल पाटील यांनी त्यांच्या नवी दिल्ली येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने गर्दीने गजबजलेल्या सदर बाजारात शोध सुरू केला. त्यावेळी एका दुकानात रुद्र हा आढळला. त्यावेळी व्हीडीओ कॉलवरुन कर्मचाऱ्यांना रुद्रचा आई-वडिलांबरोबर संवाद घडविला. त्यानंतर रुद्र हा सुखरुपपणे घरी परतला.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी तत्काळ हालचाली केल्यामुळे, आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला, याबद्दल रुद्रचे वडील निलेश भोईर यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले. तसेच कृतज्ञता व्यक्त केली.दरम्यान, रुद्रप्रमाणे भविष्यात मुलांचे अपहरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक मुलगा व पालकांनीही सतर्क राहावे. शाळकरी मुलांनी कोणत्याही अनोळखी माणसाबरोबर संवाद साधू नये. संशयास्पद व्यक्तींची माहिती लगेचच पालक वा पोलिसांना कळवावी. अशा प्रकरणांबाबत पोलिसांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आहे.