फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्ती विवाह लावणे, ५० हजार ते १.२५ लाख रुपयांत मुलींची विक्री आणि लग्नानंतर शारीरिक व मानसिक छळ करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या गंभीर घटनेत वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
फिर्यादी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न केवळ १४ वर्षांचे असताना जीवन बाळासाहेब गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्यासोबत जबरदस्ती करण्यात आले. लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यात आल्या, तसेच ५० हजार रुपयांची रोख देवाणघेवाण करून मुलीला विकले गेले.
लग्नानंतर काही काळ संसार सामान्य चालला, मात्र २०२३ मध्ये पीडितेला जबरदस्तीने गरोदर केले गेले. पती व सासरच्या मंडळींकडून सतत शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला, मुलगी झाल्यानंतर छळाची तीव्रता वाढली. पतीने सांगितले “तुझे लग्न मी ५० हजार रुपये देऊन विकत आणले आहे.” यासोबतच गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून जन्मतारीख बदलली, मूळ जन्मतारीख १०/१०/२००८ असून पतीने ती २०/१०/२००३ दाखवली. या प्रकरणातील आरोपींमध्ये जीवन बाळासाहेब गाडे (पती), अमोल गाडे (चुलत सासरे), बाळासाहेब गाडे (सासरे), दोन चुलत सासू आणि एक नातेवाईक महिला यांचा समावेश असून यातील मध्यस्थी करणारे आरोपी रवि कृष्णा कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तपासात श्रमजीवी संघटनेच्या निदर्शनास असेही समोर आले की बुधावली कातकरी वाडी, तालुका वाडा येथील अजून चार मुलींची अकोले भागात १ लाख ते सव्वा लाख रुपये घेऊन लग्न लावून विक्री केली गेली आहे. या गंभीर घटनेवर श्रमजीवी संघटना महाराष्ट्र चे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चिटणीस विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी माहिती मिळताच आवाज उठवला. संघटनेचे भरत जाधव तालुका अध्यक्ष, सुरज दळवी तालुका सचिव, रेखा पऱ्हाड महिला संघटक, सुजाता पारधी ता. उपाध्यक्ष, मोतीराम वारे ता. उपाध्यक्ष यांनी हा प्रकार उजेडात आणला.
माहितीनुसार ही घटना दाबून ठेवण्याचा विविध स्तरावर जोमाने प्रयत्न झाले परंतु संघटनेने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आदिम जमातीतली कातकरी समाजाची परिस्थिती कर्जबाजारी व दारिद्र्याने पिचलेली आहे. अशा परिस्थितीत, दलालांच्या मार्फत अल्पवयीन मुलींची विक्री वाढत चालली आहे. संघटनेने जिल्हा प्रशासनाने ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व PESA मोबिलायझर यांच्यामार्फत माहिती घेऊन संबंधित दलालांवर तात्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे; अन्यथा श्रमजीवी संघटना सामाजिक प्रश्नावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. सुरेश रेंजड यांनी दिला आहे.
या सर्वांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 394/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३७६(२)(एन), ३७०, ४६८, ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ आणि पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.उपनिरीक्षक सुमेध मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास एसडीपीओ जव्हार एस. एस. महेर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे करत आहेत.