
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील राहुड येथे भावाच्या हातून भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वाटणाऱ्या वादातून मोठ्या भावानेच धाकट्या भावाचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपळगावराजा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे.
चेतन संजय इंगळे (वय ३५) हा तरुण अचानक बेपत्ता झाल्यानंतर गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. तो घरी परतला नाही, यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थ चिंतेत होते. दरम्यान, गावचे पोलिस पाटील विलास बनसोडे यांना चेतनच्या खुनाची माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने पिंपळगावराजा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत मुळीक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला.
तपासादरम्यान संशयाची सुई चेतनचा मोठा भाऊ रोशन संजय इंगळे (वय ३६) याच्याकडे वळली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. रोशनने त्याचा मित्र रवी देविदास राऊत (वय ३६, रा. खामगाव) याला सुपारी देऊन भावाचा खून केल्याचे उघड झाले. बुधवारी दुपारी राहुड येथील शेतात चेतनला गाठून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या चेतनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातच जाळून टाकला. इतकेच नव्हे तर मृतदेहाची राख गोळा करून जवळील नदीत विसर्जित केली, ज्यामुळे गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गेला. या अमानुष प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
या घटनेमागे प्रेमप्रकरण आणि मालमत्तेचा वाद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चेतनचे दुसऱ्या जातीतील महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. त्यासाठी तो आपल्या वाट्याची शेती विकण्याच्या तयारीत होता. मात्र, याला मोठा भाऊ रोशनचा तीव्र विरोध होता. या वादातूनच त्याने भावाचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी रवी राऊत याला ११ हजार रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी रोशनला अटक केल्यानंतर दुसरा आरोपी रवी राऊत हा खामगाव शहरात लपून बसल्याची माहिती मिळाली. शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्यालाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पिंपळगावराजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे नातेसंबंधातील तणाव आणि लोभामुळे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.