
फोटो सौजन्य - Social Media
प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाची उत्सुकता वाढत असताना, चित्रपटातील प्रमुख कलाकार काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि लेखक-निर्माते सागर बी. शिंदे यांनी महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. सार्वजनिक आरोग्य आणि अन्नसुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर आधारित चित्रपटामुळे ही भेट विशेष चर्चेत आली आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप; व्यसनमुक्तीचा देणार शक्तिशाली संदेश
या भेटीदरम्यान तुकाराम मुंडे यांनी अन्नभेसळ आणि कीटकनाशकयुक्त शेतीसारख्या गंभीर विषयावर चित्रपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. त्यांनी सोशल मीडियावरही या चित्रपटाला शुभेच्छा देत समाजासाठी महत्त्वाच्या विषयावर भाष्य केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. अभिनेत्री काजल अग्रवाल यांनीही मुंडे यांच्या प्रामाणिक आणि जनहितवादी कार्यपद्धतीबद्दल आदर व्यक्त केला.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, लेखन व निर्मिती सागर बी. शिंदे यांनी केली आहे. २४ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.
‘द इंडिया स्टोरी’ मध्ये कीटकनाशकयुक्त शेती, अन्नभेसळ आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यासारख्या गंभीर विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. समाजात जागरूकता निर्माण करणे आणि या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक साईंदाणे, अनीता जाधव, विनायक साईंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तर छायांकन निशांत भागवत, संगीत मंगेश ढाकडे, संकलन आशीष म्हात्रे, गीतलेखन शकील आझमी आणि ध्वनी संकल्पना अनमोल भावे यांनी सांभाळली आहे. सार्वजनिक आरोग्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.