फोटो सौजन्य - Social Media
मालिकेच्या सध्याच्या कथानकात पाताळदेवी आणि तिचा चेला भुजंग यांनी चातुर्मास सुरू होऊ नये म्हणून अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार विकारांच्या माध्यमातून भुलोकावर संकट निर्माण केले आहे. यापैकी अकालमृत्यू, भय आणि चिंता या संकटांवर मात केल्यानंतर आता व्यसनाच्या रूपातील सर्वात कठीण आव्हान देवीसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे कथेला अधिक नाट्यमय आणि भावनिक वळण मिळाले आहे.
‘दिव्य स्वस्तिकाचा’ चौथा आठवडा भिक्या या पात्राभोवती फिरणार आहे. भुजंगाने दिलेल्या मायावी सारीपाटाच्या मोहात अडकलेल्या भिक्याला जिंकण्याची सवय लागते आणि हळूहळू त्याचे रूपांतर व्यसनात होते. प्रत्येक विजयासोबत त्याच्या आयुष्यातील काही वर्षे कमी होत जातात, मात्र या भयावह सत्याची त्याला जाणीव होत नाही. व्यसनाच्या गर्तेत अडकलेला भिक्या स्वतःचे आयुष्य, नातेसंबंध आणि कुटुंब गमावण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो.
अशा परिस्थितीत आई तुळजाभवानी कोणताही चमत्कार न करता भिक्याला स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर व्यसनातून बाहेर पडण्याची प्रेरणा देते. देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप केवळ दैवी शक्तीचे प्रतीक नसून, माणसाच्या आत्मविश्वासाला जागवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे रूप म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे या कथानकातून व्यसनमुक्तीचा सामाजिक संदेशही प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे.
या प्रवासात ब्रह्मांडातील ‘दिव्य स्वस्तिक’ पूर्णत्वाकडे वाटचाल करताना दाखवले जाणार आहे. स्वस्तिकाचा चौथा हात तेजाने उजळण्याचा क्षण मालिकेतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, त्यानंतर चातुर्मासाच्या पवित्र प्रारंभाचा सोहळा उलगडणार आहे. भक्ती, श्रद्धा, संघर्ष आणि आत्मपरिवर्तन यांचा संगम या विशेष भागांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
दैवी शक्ती, प्रेरणादायी कथानक आणि समाजप्रबोधनाचा संदेश यांचा संगम असलेला ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ हा विशेष ट्रॅक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. व्यसनासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर प्रकाश टाकत जीवनाला सकारात्मक दिशा देणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल. ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका कलर्स मराठीवर दररोज रात्री ८:५० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.






