
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Independence Day Special: स्वातंत्र्य म्हणजे केवळ मोकळेपणाने जगण्याचा अधिकार नव्हे, तर स्वतःचे विचार मांडण्याचे धैर्य, आपल्या स्वप्नांसाठी उभे राहण्याची ताकद आणि त्यासोबत आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणेही आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून पडद्यावर साकारल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखांचा प्रेक्षकांच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर मोठा प्रभाव पडतो. आपल्या आवडत्या कलाकारांच्या भूमिका पाहताना प्रेक्षक त्यांच्या संघर्षाशी, विचारांशी आणि स्वप्नांशी जोडले जातात.
‘कमळी’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अभिनेत्री विजया बाबरने आपल्या हक्कांसाठी, स्वप्नांसाठी आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्यासाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या मुलीची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली आहे. तिच्या व्यक्तिरेखेने तरुण-तरुणींसोबतच शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना प्रेरणा दिली आहे.
स्वातंत्र्याचा अर्थ सांगताना विजया बाबर म्हणाली, “स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही भीतीशिवाय मनमोकळेपणे जगणे. एक कलाकार म्हणून मी कोणत्याही एका बाजूची व्याख्या न करता मानवी भावना जशा आहेत, तशा प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते.”
डिजिटल क्रांतीमुळे आज प्रत्येक सामान्य व्यक्तीला स्वतःचे विचार मांडण्याची आणि पुढे जाण्याची समान संधी मिळाल्याचंही विजयाने सांगितलं. शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांनाही डिजिटल माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळत असल्याचं ती म्हणाली.
‘आजचा भारत आपल्या संस्कृतीवर अधिक अभिमान बाळगतोय’
विजया पुढे म्हणाली की, आज चित्रपट आणि मालिकांमध्ये केवळ काल्पनिक कथांपेक्षा आपल्या घरातील, आपल्या मातीशी जोडलेल्या आणि वास्तविक आयुष्यातील कथा अधिक पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कलाकारांसोबत प्रेक्षकही घडत आहेत, हे चित्र आशादायी असल्याचं तिने सांगितलं.
आजची स्त्री कणखर आणि अभ्यासू असण्यासोबतच भावनाशीलही आहे आणि या दोन्ही बाजू महत्त्वाच्या असल्याचं विजयाने नमूद केलं. नवीन पिढीने कितीही प्रगती केली तरी आपल्या माणसांचा आदर करावा, जबाबदारीचं भान ठेवावं आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जावं, असंही तिने सांगितलं.
‘दीपज्योती’ मालिकेतील ‘ज्योती’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हीदेखील आपल्या विचारांवर ठाम राहणारी आणि आपल्या माणसांसाठी लढणारी व्यक्तिरेखा साकारत आहे.
पूर्वाच्या मते, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांच्या आयुष्यात झालेला मोठा सकारात्मक बदल म्हणजे स्वतःचं मत मांडण्याचा वाढलेला आत्मविश्वास. ती म्हणाली, “माणसं हल्ली बोलायला लागली आहेत. स्वतःचं मत मांडण्यासाठी बिनधास्तपणे व्यक्त व्हायला लागली आहेत. हा लोकशाहीचाच एक भाग आहे आणि सध्याच्या काळात हा खूप मोठा आणि गरजेचा सकारात्मक बदल आहे.”
सोशल मीडियामुळे आजच्या पिढीला विविध विषयांवर व्यक्त होण्याची आणि चर्चा करण्याची संधी मिळत असल्याचंही पूर्वाने सांगितलं. लोकशाही, राजकारण, शिक्षण, रोजगार यांसारख्या विषयांवर आपलं मत मांडण्यासोबतच आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांची माहिती मिळण्यासही सोशल मीडिया मदत करत असल्याचं ती म्हणाली.
‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही’
स्वातंत्र्याची स्वतःची व्याख्या सांगताना पूर्वा म्हणाली, “माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे मला माझं मत स्पष्टपणे मांडता येणं. मी थोडीशी बंडखोर वृत्तीची मुलगी आहे आणि माझ्या भूमिकांमधूनही माझी ही बंडखोरी दाखवण्याचा प्रयत्न करते.”
मात्र, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसल्याचं ती स्पष्ट करते. स्वातंत्र्यासोबत जबाबदारी आणि जागरूकताही तितकीच महत्त्वाची असल्याचं पूर्वाने सांगितलं.
नवीन पिढी आपल्या स्वप्नांबद्दल आणि मतांबद्दल ठाम आहे, ही सकारात्मक बाब असल्याचं ती म्हणाली. मात्र, स्वतःच्या अधिकारांसाठी बोलताना आपल्या शब्दांमुळे किंवा कृतीमुळे इतरांचा अपमान होणार नाही, याची जाणीवही असायला हवी, असं पूर्वाने नमूद केलं.
Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा
विजया बाबर आणि पूर्वा कौशिक यांच्या विचारांमधून स्वातंत्र्याचा व्यापक अर्थ समोर येतो. स्वतःच्या विचारांसाठी आणि स्वप्नांसाठी ठामपणे उभं राहताना इतरांचा आदर, सामाजिक जबाबदारी आणि जागरूकता जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा केवळ स्वातंत्र्य साजरा करण्याचा दिवस नसून, स्वातंत्र्याचा योग्य अर्थ समजून घेऊन तो जबाबदारीने अमलात आणण्याची आठवण करून देणारा दिवस आहे.