
फोटो सौजन्य - Social Media
घरातील आगीच्या खुणा, विचित्र अनुभव आणि स्वप्नांत दिसणाऱ्या घटनांमुळे गंगा अस्वस्थ होते. त्याचवेळी स्वामी समर्थ सूचित करतात की आता भूतकाळातील रहस्य समोर येण्याची आणि गोवर्धनच्या कर्मांचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. गंगा आणि गायत्री यांच्यातील नात्याचा उलगडा होत असतानाच कथानक अधिक उत्कंठावर्धक बनत आहे.
दुसरीकडे, मार्तंडच्या प्रभावाखाली आलेला गोवर्धन स्वामी समर्थांना विषारी लाडू देऊन त्यांचा जीव घेण्याचा कट रचतो. प्रायश्चित्ताच्या नावाखाली तो स्वामींच्या समोर येतो, मात्र स्वामी त्याला स्वतःचा गुन्हा कबूल करण्याची अखेरची संधी देतात. तरीही सत्य स्वीकारण्याऐवजी तो आपल्या पापांच्या ओझ्याखाली दबत जातो.
“कोडं सुटायची वेळ झाली… केलेली कर्म फिटायची वेळ झाली,” या स्वामी समर्थांच्या शब्दांनी गोवर्धन हादरून जातो. आता गंगा गायत्रीपर्यंत पोहोचेल का, गोवर्धन आपल्या गुन्ह्याची कबुली देईल का आणि भूतकाळातील नेमके कोणते धक्कादायक सत्य समोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
सत्य आणि असत्याच्या संघर्षाला नवे वळण देणारे हे भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहेत. जय जय स्वामी समर्थ ही मालिका दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.