
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kamli-Tarini Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिकांमध्ये आता कथेला नवी वळणं मिळणार आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि सत्यासाठी लढणाऱ्या या दोन्ही मालिकांमधील नायिका प्रेक्षकांना प्रेरणादायी संघर्षाचा अनुभव देणार आहेत.
एका बाजूला कमळी स्वाभिमान, शिक्षण आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभी आहे, तर दुसरीकडे तारिणी सत्याचा शोध घेत न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक संकटाचा सामना करत आहे. दोघींचे मार्ग वेगळे असले तरी अन्यायाविरोधात लढण्याचा त्यांचा उद्देश समान आहे.
‘कमळी’च्या आयुष्यात आता संघर्ष आणखी वाढणार आहे. रितेश आणि कमळी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. रितेशने दिलेला प्रस्ताव कमळी स्पष्ट शब्दांत नाकारते. आपल्या स्वाभिमानाशी कोणतीही तडजोड न करण्याचा तिचा निर्णय रितेशच्या अहंकाराला धक्का देणार आहे.
दरम्यान, अनिका रितेशची साथ देत कमळीसमोर नवी संकटं उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता रितेश आणि अनिकाच्या डावपेचांना कमळी कशा पद्धतीने उत्तर देणार? तिचा आत्मविश्वास या संकटांवर मात करू शकेल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘तारिणी’ मालिकेतही थरारक वळण पाहायला मिळणार आहे. युवराजची सुटका होताच तो केदार आणि तारिणीवर त्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करतो. युवराजच्या सुटकेची बातमी लाईव्ह करण्याची जबाबदारी केदारवर असते.
याचदरम्यान युवराजला एका अनोळखी व्यक्तीकडून नव्या डीलसंदर्भात फोन येतो. या फोनमुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि गुलाबच्या मागे असलेल्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेण्याचा तो निर्णय घेतो.
दुसरीकडे, घरातील पूजेदरम्यान तारिणीला काही महत्त्वाचे संकेत मिळतात. या संकेतांमुळे संपूर्ण कटामागे घरातीलच कोणीतरी व्यक्ती असल्याचा संशय तिच्या मनात निर्माण होतो. आता तारिणीचं संशयाचं वर्तुळ कुणावर थांबणार? या कटामागचा खरा सूत्रधार कोण आहे? हे पाहणे रंजक ठरणार आहे.