
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Renuka Shahane: झी ५ मराठीवरील आगामी वेब सिरीज ‘अगं आई अहो आई’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांनी या प्रकल्पाविषयी आणि त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. पटकथा वाचल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया, व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य आणि आई-मुलीच्या नात्याविषयी त्यांनी खास भावना व्यक्त केल्या.
रेणुका शहाणे म्हणाल्या, “जेव्हा दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी मला या वेब शोची कथा सांगितली आणि संपूर्ण संकल्पना समजावून सांगितली, तेव्हाच ती मला खूप आवडली. लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण त्या वेळी आईच्या मनात सुरू असणारी भावनिक घालमेल या कथेत अतिशय संवेदनशीलपणे मांडली आहे. कल्याणीने पटकथेत त्याचं सुंदर रूपांतर केलं आहे.”
त्यांनी पुढे सांगितलं, “पडद्यावर एका मुलीची आई साकारण्याचं माझं खूप दिवसांचं स्वप्न होतं आणि ‘अगं आई अहो आई’मुळे ते पूर्ण झालं. माझे दोन मुलगे असल्यामुळे मुलगी आणि आईचं नातं साकारण्याची ही माझ्यासाठी वेगळी आणि खास संधी होती. जानकी ही व्यक्तिरेखा अतिशय शिस्तप्रिय आहे आणि माझी आईदेखील तशीच असल्याने ही भूमिका मला सहज करता आली.”
या प्रकल्पामागील टीमचंही त्यांनी कौतुक केलं. “वरुण नार्वेकरसोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. तो अत्यंत संवेदनशील आणि नव्या पिढीचा दिग्दर्शक आहे. त्याचं आधीचं काम मला खूप आवडलं होतं. निर्मिती सावंत माझी जवळची मैत्रीण आहे, तर हृतासोबत पहिल्यांदाच काम करूनही तसं कधीच जाणवलं नाही. पटकथा, व्यक्तिरेखा आणि संपूर्ण कलाकारांची निवड अप्रतिम आहे,” असं त्या म्हणाल्या.
सासू आणि आईच्या नात्याविषयी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “आजच्या आणि आधीच्या पिढीमध्ये मोठा फरक आहे. पूर्वी सासूबाईंनी सांगितलेलं न विचारता स्वीकारावं लागत असे. पण आजची पिढी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते, समजून घेते आणि मग निर्णय घेते. त्यामुळे नातेसंबंध अधिक समजूतदारपणे आणि समानतेने घडताना दिसतात.”
त्यांच्या मते, ‘अगं आई अहो आई’ ही मालिका याच बदलत्या नात्यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. पारंपरिक समजुतींना सूक्ष्मपणे छेद देत दोन पिढ्यांमधील संवाद आणि भावनिक नात्यांची सुंदर मांडणी या वेब शोमध्ये पाहायला मिळणार आहे.
ही मालिका एका मुली, तिची आई आणि तिची सासू यांच्यातील दुर्मिळ आणि सुंदर नात्याचा प्रवास साजरा करते. कुटुंब एकत्र आलं की प्रेम अधिक फुलतं, हे या कथेतून अधोरेखित होतं. ही ओरिजिनल मालिका २४ जुलै २०२६ पासून केवळ मराठी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.