
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ प्रेक्षकांसाठी आणखी एका रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. आगामी भागांमध्ये शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नसोहळ्यात मोठा गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे, प्रतापरावांच्या उपस्थितीमुळे शालिनीच्या भूतकाळाशी संबंधित एक महत्त्वाचे सत्य सर्वांसमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मोहिनीच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. वेडिंग प्लॅनर आणि डेकोरेशन टीमच्या मदतीने लग्नाच्या प्रत्येक गोष्टीचे नियोजन करण्यात येत असून मोहिनी घरातील सदस्यांना संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देताना दिसणार आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात आरके आणि बंटी काहीतरी वेगळाच डाव आखताना दिसत आहेत. दोघेही लग्नसोहळ्यात मोठा गोंधळ घालण्यासाठी तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.याचवेळी पारूबाईने घरात आणलेला ज्योतिषी हे लग्न झाल्यास मोठा अनर्थ होईल अशी भविष्यवाणी करतो, पण मोहिनी मात्र कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळी लग्न लावून देण्यावर ठाम आहे.
‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मालिकेत सध्या एकामागून एक घडणाऱ्या नाट्यमय घटनांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शालिनी आणि महेंद्र यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाच अनेक अनपेक्षित घडामोडी या सोहळ्याला वेगळे वळण देताना दिसत आहेत.कार्तिकीकडून नकळत प्रतापरावांशी संपर्क साधला गेल्याने शालिनीसह संपूर्ण कुटुंबात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतापरावांच्या नावानेच अस्वस्थ होणाऱ्या शालिनीला या प्रसंगामुळे पुन्हा भूतकाळाच्या आठवणींना सामोरे जावे लागत आहे. याआधी मोहिनीने शालिनीच्या आयुष्यातील जुन्या बंधनांचे प्रतीक असलेले मंगळसूत्र तोडून तिला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी धीर दिला होता. तसेच, वेळ आल्यास प्रतापरावांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्याची प्रतिज्ञाही तिने केली होती.दरम्यान, आरकेने मोहिनीच्या कुटुंबाविषयी सविस्तर माहिती मिळवत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आपल्या श्रीमंतीचा प्रभाव वापरत त्याने मोहिनीला महागडे मंगळसूत्र खरेदी करण्यास भाग पाडले. हेच मंगळसूत्र परत करण्यासाठी शालिनी आरकेच्या घरी जाणार असल्याने कथानक अधिक रंगतदार बनले आहे.
लग्नाच्या तयारीत आणखी एक भावनिक क्षण पाहायला मिळणार आहे. महेंद्र स्वतः शालिनीसाठी नवीन मंगळसूत्र घेऊन येणार असून तिच्या हातावर लग्नाची मेहंदीही रंगू लागणार आहे. मात्र, त्या मेहंदीमुळे शालिनीच्या मनात भूतकाळातील काही वेदनादायक आठवणी जाग्या होणार आहेत.
याशिवाय, आरके आणि मोहिनी यांचा दुकानातील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आधीच वातावरण तापलेले असताना मुकुंदही मोहिनीला लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शालिनी-महेंद्र यांच्या लग्नसोहळ्यात आणखी एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आगामी भागांमध्ये नाट्यमय घडामोडींना वेग येणार आहे. लग्नसोहळ्याच्या तयारीला रंग चढत असतानाच शालिनीच्या हातावर मेहंदी रंगू लागली आहे. मात्र, याचवेळी प्रतापराव मुंबईकडे रवाना झाल्याने शालिनी आणि महेंद्र यांच्या आयुष्यात नव्या संकटाची चाहूल लागली आहे.एका बाजूला आरकेचे गुप्त डाव आणि लग्नात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसऱ्या बाजूला प्रतापरावांची अचानक होणारी एन्ट्री अनेक प्रश्न निर्माण करत आहे. त्यांच्या आगमनामुळे शालिनीच्या भूतकाळाशी संबंधित सत्य पुन्हा समोर येणार का आणि त्याचा या लग्नावर काय परिणाम होणार, याची उत्सुकता वाढली आहे.शालिनी आणि महेंद्र यांचे लग्न सर्व अडथळ्यांवर मात करून पार पडणार की नव्या वादळामुळे या नात्याची पुन्हा परीक्षा होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर, शालिनीला न्याय मिळवून देण्याची घेतलेली प्रतिज्ञा मोहिनी कशा प्रकारे पूर्ण करते आणि समोर उभ्या राहिलेल्या संकटांना कशा धैर्याने तोंड देते, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.आगामी भागांमध्ये भावनिक संघर्ष, धक्कादायक खुलासे आणि अनपेक्षित ट्विस्ट्सची मेजवानी पाहायला मिळणार आहे.