
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ramayana Trailer Out: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित अधिकृत ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे(Ramayana Trailer Out) . ३० जुलै २०२६ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भारतीय भाषांमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. दिवाळी २०२६ मध्ये हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून त्याचे जागतिक वितरण सोनी पिक्चर्स करणार आहे. उत्तर भारतातील वितरणाची जबाबदारी धर्मा प्रोडक्शन्सकडे सोपवण्यात आली आहे.
निर्माता नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओज, आठ वेळा ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहनिर्मितीत साकारलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून त्याच्या भव्यतेचे आणि दृश्य परिणामांचे विशेष कौतुक केले जात आहे.
ट्रेलरमध्ये भगवान राम आणि रावण यांच्यातील धर्म-अधर्माच्या संघर्षाची भव्य मांडणी करण्यात आली आहे. रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत संयमी, शांत आणि तेजस्वी दिसत आहे, तर रॉकिंग स्टार यश रावणाच्या भूमिकेत अत्यंत प्रभावी आणि दमदार वाटतो. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून आणि रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
चित्रपटात भगवान विष्णूंचा रामावतार, वनवास, सीतेचे अपहरण आणि पुढे घडणाऱ्या महासंग्रामाची सुरुवात प्रभावी दृश्यांमधून दाखवण्यात आली आहे. भव्य सेट्स, उत्कृष्ट VFX आणि सिनेमॅटिक सादरीकरणामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांना हॉलीवूड दर्जाचा अनुभव देतो, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि रवि दुबे यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकेयी, अजिंक्य देव ऋषी विश्वामित्र, कुणाल कपूर भगवान इंद्र आणि रकुल प्रीत सिंग शूर्पणखा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी ऑस्कर विजेते हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार व तंत्रज्ञांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला असून दृश्य परिणामांसाठी DNEGच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
निर्माता नमित मल्होत्रा यांनी ‘रामायण’ ही केवळ कथा नसून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत, ही महागाथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत भव्य स्वरूपात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
तर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘रामायण’ ही संपूर्ण मानवजातीची कथा असून तिच्या भावना, मूल्ये आणि परंपरेचा आदर राखत सर्वोच्च दर्जाचा सिनेमाई अनुभव देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.
ट्रेलरला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘रामायण: पार्ट १’ हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे.