Indian Defence System: भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) स्वदेशी बनावटीची नवीन एअर डिफेन्स सिस्टिम (Air Defence System) विकसित केली आहे. २३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवर या एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (IADWS) पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान, क्षेपणास्त्रांनी आपल्या लक्ष्यांचा अचूक वेध घेत त्यांना हवेतच नष्ट केले, ज्यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
ही एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS) एक बहु-स्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. यामध्ये पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तीन प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे:
क्विक रिएक्शन सरफेस-टू-एअर मिसाईल (QRSAM): ही क्षेपणास्त्रे त्वरित प्रतिक्रिया देऊन शत्रूच्या हवाई लक्ष्यांना नष्ट करतात.
वेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टिम (VSHORADS): ही प्रणाली कमी पल्ल्याच्या हवाई धोक्यांना प्रभावीपणे रोखते.
लेझर-आधारित डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW): ही उच्च-शक्तीची लेझर-आधारित प्रणाली शत्रूच्या लक्ष्यांना ऊर्जा वापरून नष्ट करते.
The @DRDO_India has successfully conducted the maiden flight Tests of Integrated Air Defence Weapon System (IADWS), on 23 Aug 2025 at around 1230 Hrs off the coast of Odisha.
IADWS is a multi-layered air defence system comprising of all indigenous Quick Reaction Surface to Air… pic.twitter.com/TCfTJ4SfSS
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 24, 2025
भारतीय हवाई संरक्षण प्रणाली जगातील सर्वात प्रगत आणि मजबूत प्रणालींपैकी एक आहे. ही प्रणाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन आणि हेलिकॉप्टर अशा हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. ही मल्टी-लेयर्ड सिस्टिम विशेषतः पाकिस्तान आणि चीनकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. भारताची हवाई संरक्षण यंत्रणा प्रगत रडार, क्षेपणास्त्र प्रणाली आणि कमांड-अँड-कंट्रोल सेंटर्सच्या एकात्मिक नेटवर्कवर आधारित आहे, ज्यामुळे ती अत्यंत प्रभावी ठरते.
एस-400 डिफेन्स सिस्टिम: रशियाकडून घेतलेली ही प्रणाली भारताच्या सर्वात महत्त्वाच्या सामर्थ्यांपैकी एक आहे. २०१८ मध्ये भारताने ५ स्क्वाड्रनसाठी ३५,००० कोटी रुपयांचा करार केला होता. ही प्रणाली ६०० किमी अंतरावरील लक्ष्यांचा शोध घेऊ शकते आणि ४०० किमीपर्यंत मारा करू शकते. एकाच वेळी ८० लक्ष्यांवर लक्ष ठेवून ३६ लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
आकाश मिसाईल सिस्टिम: DRDO आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने विकसित केलेली ही स्वदेशी प्रणाली २५-४५ किमीच्या पल्ल्याची आहे. याची पुढील आवृत्ती ‘आकाश नेक्स्ट जनरेशन’ची रेंज ७०-८० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे, जी १५० किमीपर्यंत ६० हून अधिक लक्ष्यांवर लक्ष ठेवू शकते.
बराक-८: भारत आणि इस्त्रायलने संयुक्तपणे विकसित केलेली ही प्रणाली ७०-१०० किमीच्या पल्ल्यासह १६ किमी उंचीपर्यंत लक्ष्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे. ही प्रणाली एकाच वेळी १६ लक्ष्यांवर २४ क्षेपणास्त्रे डागू शकते आणि नौदल तसेच भूदलात वापरली जाते.