
दिल्ली : मागील काही दिवसांपासून भारत आणि मालदीव देशामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम मालदीवच्या पर्यटनावर देखील झाला आहे. मालदीव व पाकिस्तानामध्ये जवळीक वाढली आहे अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. यानंतर मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी शुक्रवारी भारताच्या बहिष्काराबाबत चिंता व्यक्त केली. माजी राष्ट्राध्यक्ष नशीद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफीसुद्धा मागितली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारतीयांची माफी मागत काळजी व्यक्त केली आहे. मोहम्मद नशीद म्हणाले, “मी भारतीय लोकांना त्यांच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटनासाठी मालदीवमध्ये येण्याचे आवाहन करू इच्छितो, आमच्या आदरातिथ्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. भारताच्या बहिष्काराचा मालदीववर मोठा परिणाम झाला आहे, असं म्हणत मला याबद्दल खूप काळजी वाटत असून, मालदीवच्या लोकांनाही याबद्दल खेद वाटतोय, जे घडले याबद्दल आम्हाला खेद वाटत असल्याची भावनाही मोहम्मद नशीद यांनी बोलून दाखवली
मालदीव आणि चीन यांच्यात नुकताच संरक्षण करार झाला आहे. परंतु नशीद यांनी हा संरक्षण करार नसून उपकरणांची खरेदी असल्याचे सांगत तो फेटाळला. “मला वाटते की मोहम्मद मुइज्जूला काही उपकरणे खरेदी करायची होती, प्रामुख्याने त्यात रबर बुलेट आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा समावेश होता. परंतु हे अत्यंत दुर्दैवी आहे की, सरकारला अधिक अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अधिक रबर गोळ्यांची गरज लागतेय. खरं तर सरकार हे बंदुकीच्या जोरावर चालत नसते हे त्यांना समजलं पाहिजे”, असंही नशीद म्हणालेत. नशीद यांनी अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी भारताच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचंही कौतुक केलं. भारताने दबाव आणण्याऐवजी राजनैतिक चर्चेचा प्रस्ताव दिल्याचंही त्यांनी अधोरेखित केले.