नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पहिले भाषण केले आहे. त्यांनी 21 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, हुकूमशाही, भ्रष्टाचार, देश, विरोधी आघाडी यांच्यावर दोरदार टीका केली आहे.
हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, हेमंत सोरेन यांनीही राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी तुरुंगातून सरकार चालवायला हवं होतं. अशा परिस्थितीत ते जिथे-जिथे निवडणूक हरतील तिथे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतील आणि सरकार पाडतील. आज मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, कारण मी या हुकूमशाहीविरोधात संघर्ष करत आहे.
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal says "When I was in jail, some people raised this issue that why doesn't Arvind Kejriwal resign from the post of Delhi CM? I have not come to become CM or PM…In the last 75 years, elections have been held in so many states, AAP government was… pic.twitter.com/75cakV0TDt — ANI (@ANI) May 11, 2024
अडवाणींप्रमाणे भाजप मोदींना निवृत्त करणार?
अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होतील. लालकृष्ण अडवाणींप्रमाणे भाजप त्यांना निवृत्त करणार का? ही निवडणूक भाजपने जिंकल्यास मोदी अमित शाह यांना पंतप्रधान करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना सरकार स्थापनेनंतर दोन महिन्यांत पदावरून हटवलं जाईल.
प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला होणार अटक
अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर आरोप करत म्हटलं की, ‘वन नेशन, वन लीडर’ मिशन अंतर्गत प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक केली जाईल. तुम्ही सर्व चोरांना तुमच्या पक्षात सामील करुन घेतलं आणि केजरीवालांना तुरुंगात पाठवलं, केजरीवालांना अटक करून करणे ही, भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई नाही, केजरीवाल यांना अटक केली म्हणजे ते कोणालाही अटक करतील, असा त्यांना संदेश द्यायचा आहे. या मिशनचं नाव ‘वन नेशन वन लीडर’ असं आहे, असं म्हणता केजरीवाल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्त्वाचं नाही…’
अरविंद केजरीवाल म्हणाले की, जेव्हा जनतेने मला पहिल्यांदा मुख्यमंत्री केले, तेव्हा मी तत्त्वांच्या आधारे 49 दिवसांच्या आत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री होण्यासाठी लोक आपला उजवा हात कापायला तयार आहेत, माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही. आज तुरुंगात जाऊनही मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला नाही, कारण गेल्या 75 वर्षांपासून आम आदमी पक्षाने दिल्लीत भारतातील सर्वात ऐतिहासिक बहुमत मिळवले आहे. कोणत्याही राज्याचे सरकार हे प्रचंड बहुमताने बनते.
अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन
दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासाठी अक्षय्य तृतीया हा अतिशय शुभ दिवस होता. निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी संध्याकाळी तिहार तुरुंगातून बाहेर आले. त्यांचे पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांनी तसेच कुटुंबीयांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.






