
Kerala Politics, Congress, KC Venugopal, Ramesh Chennithala, VD Satheesan, Kerala CM Race,
दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पाच दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित झालेला नाही. तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) सत्तेत परतला असला, तरी सरकार स्थापनेबाबत पक्षांतर्गत चर्चा आणि हालचाली सुरूच आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री निवडीसाठी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Kerala Election Results : केरळमध्ये UDF ने सुरुवातीच्या कलात बहुमताचा …
दरम्यान, काँग्रेसकडून मुख्यमंत्री निवडताना तीन प्रमुख घटकांवर भर दिला जाणार असल्याची माहिती आहे. सर्वप्रथम नव्याने निवडून आलेल्या आमदारांचे मत जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर मित्रपक्षांची भूमिका आणि मतांचा आढावा घेतला जाईल. तसेच जनतेमध्ये कोणत्या नेत्याला अधिक पसंती आहे, यासाठी लोकमताचाही अंदाज घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सध्या के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय, काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांशी चर्चा करणार आहे.जर तिन्ही नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाला सहमती दर्शवली, तर मुख्यमंत्रीपदाची घोषणा तातडीने केली जाईल. मात्र, मतभेद झाल्यास संबंधित नेत्यांना दिल्लीला बोलावून चर्चा केली जाणार असल्याचेही समोर आले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत मित्रपक्षांनी स्वतंत्र भूमिका मांडली असली, तरी अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे सहयोगी पक्षांच्या भूमिकेचा अंतिम निर्णयावर फारसा परिणाम होणार नसल्याचे मानले जात आहे.
केरळचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत काँग्रेस पक्षाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी पक्षातील सूत्रांकडून के. सी. वेणुगोपाल यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि अलाप्पुझाचे खासदार असलेले वेणुगोपाल हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
पक्ष संघटन मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे के. सी. वेणुगोपाल यांना राष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा मोठा फायदा मिळू शकतो, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्षाच्या रणनीती आखण्यात आणि विविध राज्यांतील संघटनात्मक कामकाजात सक्रिय सहभाग घेतला आहे.
काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या मते, वेणुगोपाल यांनी पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय राजकारणातील अनुभव, पक्ष नेतृत्वाशी असलेले निकटचे संबंध आणि केरळमधील मजबूत जनाधार यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी मिळाल्यास अनुभवी आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम चेहरा मुख्यमंत्रीपदी देण्याची पक्षाची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.