
नवी दिल्ली : भारत देश आता चांगली प्रगती करताना दिसत आहे. आपला देश वेगवान अर्थव्यवस्था (India Economy) असलेला देश आहे. देशाचा आर्थिक विकास वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण असे असताना मोठ्या संख्येने श्रीमंत (Reach Peoples) लोक देश सोडून जाताना दिसत आहे. याबाबत एक अहवाल समोर येत आहे. त्यामध्ये देशातील 6500 धनाढ्य लोक चालू वर्षात भारताबाहेर जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होऊ पाहत आहे. भारतात व्यवसाय करणे सोपे झाले आहे आणि व्यावसायिकांना सर्व प्रकारच्या सवलती मिळत आहेत. पण अनेक धनाढ्य लोक भारत सोडून परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक अतिश्रीमंतांच्या स्थलांतरात चीनचा पहिला क्रमांक आहे. तर त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागत आहे.
कोण-कोणत्या देशांना पसंती?
एका अहवालानुसार, श्रीमंत भारतीय कुटुंबांसाठी दुबई आणि सिंगापूर ही पसंतीची ठिकाणे आहेत. गोल्डन व्हिसा, अनुकूल कर वातावरण, व्यावसायिक सुरक्षितता आणि शांत वातावरण यांसारखे प्रोत्साहन भारतीयांना या देशांमध्ये स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान, इन्फोसिसच्या बोर्डाचे माजी सदस्य टी. व्ही. मोहनदास पै यांनी ट्विट करून भारतीय श्रीमंतांच्या पलायनासाठी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे.