
Siddaramaiah resigns as Karnataka CM 2026
Siddaramaiah Resignation: “मला कर्नाटकातील सात कोटी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. दोन वेळा मुख्यमंत्री आणि दोन वेळा विरोधी पक्षनेते होण्याची संधी मिळाली. यासाठी मी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा ऋणी आहे.”अशा शब्दांत काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
खरंतर कर्नाटकचे राजकारणात एका नव्या वळणावर आले आहे. सिद्धारामय्या यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम लागला. राजीनामा दिल्यानंतर सिद्धारामय्या यांनी त्यांच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.
राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “हायकमांडने सांगितल्याप्रमाणे मी केले. पक्षाच्या नेतृत्वाने सुरुवातीपासूनच मला राजीनामा देण्यास सांगितले होते. राज्यपाल परतल्यानंतर संविधानानुसार माझा राजीनामा स्वीकारला जाईल, याची मला खात्री आहे. संविधान सर्वोच्च आहे आणि आम्ही नेहमी घटनात्मक मूल्यांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला. लोकांनी आम्हाला निष्ठावान अनुयायी म्हणून स्वीकारले आणि समर्थक कायम आमच्या पाठीशी उभे राहिले.”
यावेळी बोलताना सिद्धारामय्या यांनी २००६ मध्ये पक्षात प्रवेश केल्यापासून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांचे आभार मानले.
आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करताना सिद्धरामय्या यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या हमी योजनांमुळे राज्याचा खजिना रिकामा होईल, अशी चुकीची माहिती पसरवण्यात आली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, काँग्रेसच्या योजनांबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.
सिद्धारामय्या म्हणाले, “मी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, हायकमांडचा आदेश मिळताच मी राजीनामा देईन. आज मी तो निर्णय घेतला असून पुढील मुख्यमंत्र्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे,”तसेच, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत १३५+१ जागांवर विजय मिळवला असून दोन अपक्ष आमदारांनीही सरकारला पाठिंबा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या अंतिम निर्णयावर चर्चा सुरू असताना, रोटेशन करारानुसार डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करायचे की दुसऱ्या कोणाचा विचार करायचा, हे ठरवले जात होते, तेव्हा प्रियांका गांधी वद्रा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि नेतृत्वाला केवळ डी. के. शिवकुमार यांचीच निवड करण्याचा, इतर कोणाचीही नाही, असा सल्ला दिला होता.