
तांदूळ २५% महाग
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका बसत आहे. बासमती आणि सामान्य बिगर-बासमती तांदूळ या दोन्हींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत बासमती तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर रोजच्या वापरातील बिगर-बासमती प्रकारच्या तांदळाच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर जास्त राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि निर्यातदारांचे म्हणणे आहे. ही दरवाढ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही घटकांमुळे झाली आहे. जागतिक मागणी आणि अमेरिका-इराण युद्धामुळे तणाव, अनेक देश आपला अन्नपुरवठा सुरक्षित करण्यासाठी वेगाने तांदूळ खरेदी करित आहे. विशेषतः आखाती देशांमध्ये भारतीय तांदळाला मोठी मागणी आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणासारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसामुळे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव यांच्या मते, तेलंगणा सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी बिगर-बासमती तांदळाची खरेदी केल्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला आहे. भाववाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबाच्या मासिक बजेटवर होत आहे.
नवीन आवक होण्यापूर्वी कमी साठा शिल्लक
केआरबीएल लिमिटेडच्या बल्क राईस एक्सपोर्ट्सचे प्रमुख अक्षय गुप्ता यांच्या मते, भारताने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १५४ देशांना विक्रमी ६.५२ कोटी टन बासमती तांदूळ निर्यात केला, त्यात सौदी अरेबिया सर्वांत मोठा खरेदीदार होता. गल्फ कॉरिडॉरमधील पेमेंट आणि शिपिंगमधील व्यत्ययांमुळे पुरवठा थोडा मंदावला आहे, परंतु मागणी मजबूत आहे. २०२५ चे पीक लवकर विकले गेले आणि ऑक्टोबरमध्ये नवीन आवक होण्यापूर्वी खूप कमी साठा शिल्लक आहे. याचा अर्थ असा की, देशांतर्गत किमती वाढण्याचे मुख्य कारण केवळ निर्यात नाही.