Sharad Pawar News: महागाईने सर्वसामान्य त्रस्त, अन् सरकार ठरवून इश्यू पुढे आणतंय!; शरद पवारांचा सनसनाटी आरोप
Baramati Politics: राज्यासह देशाची अर्थव्यवस्था अडचणीत जात असताना महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मात्र, या मूळ प्रश्नाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे इश्यू पुढे केले जात असून, हे सरकारच्या सहमतीने ठरवून केले जात असल्याचे दिसत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
गोविंदबाग, बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, “आज कुटुंबप्रमुखांना दैनंदिन गरजा भागविणेही अवघड झाले आहे. महागाई वाढत असताना त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याऐवजी शिक्षणासह अन्य विषय पुढे आणले जात आहेत. लोकांनी त्या विषयांवर चर्चा करत बसावे आणि मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष व्हावे, असे चित्र निर्माण केले जात आहे.”
Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करात कोणकोणत्या रेजिमेंट्स आहेत? जाणून घ्या
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा दाखला देत सरकारने स्वीकारलेले धोरण चुकीचे असल्याचे न्यायव्यवस्थेने स्पष्ट केले आहे, असे सांगितले. लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना चिन्ह वाटपाच्या सुनावणीबाबत भाष्य करण्यास नकार देत, “अजून सुनावणी सुरू आहे. अंतिम निकाल येईपर्यंत थांबूया. आठ-दहा दिवसांनी यावर चर्चा करू,” असे पवार म्हणाले.
देशाच्या तिमाही जीडीपीवर भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्र दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी सामान्य जनतेच्या अडचणींकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे ते म्हणाले. आगामी काळात रुपयाचे अवमूल्यन झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होऊन महागाईच्या झळा अधिक तीव्र होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत पवार म्हणाले की, १६ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली असून त्यात बदल होण्याची शक्यता आहे. बारामतीत उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संस्थेची ते पाहणी करणार असून, त्यांना सविस्तर प्रेझेंटेशन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
साखरेच्या वाढत्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळायला हवा. उत्पादन खर्च वाढत असताना वाढलेल्या दरातील योग्य हिस्सा शेतकऱ्याच्या हातात गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साखर आयात करण्याचा निर्णय योग्य नसल्याचेही पवार म्हणाले.
पावसाअभावी राज्यातील परिस्थिती गंभीर होत असून, मराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद होत असल्याचे त्यांनी सांगितले. “संकटातील माणसाला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
दूध भेसळीविरोधातील तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे समर्थन करताना पवार यांनी भेसळ थांबल्यामुळे ग्राहकांना शुद्ध दुधासाठी अधिक पैसे देण्याची तयारी असल्याचे नमूद केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सरकार काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विखे-पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार यांनी, “१९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करताय? आजपर्यंत तुम्ही सत्तेतच आहात की,” असा सवाल केला.






